शाळेची वाजली घंटा; पण... आईला वाटतेय.. मुलांची काळजी.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने पालक धास्तावले...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात माध्यमिक शाळांची घंटा वाजल्यानंतर दुसर्याच दिवशी आठवी ते बारावीच्या दीडशे शाळा सुरू झाल्या. त्यात 14 हजार 778 विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली गेली आहे. काही गावात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. रुग्ण नसलेल्या गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी शासन निर्णय काढून सूचना दिल्या. त्यानुसार, शाळा सुरू करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या ठरावावर, तसेच पालकांच्या संमतीवर सोपविण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 1 हजार 596 गावे असून, 849 गावांमध्ये कोरोना रुग्ण नाहीत. जिल्ह्यात आठवीपासून बारावीपर्यंत सुमारे तेराशे शाळा आहेत. त्यापैकी 15 जुलैला 133 तर 16 जुलैला 151 शाळा जिल्ह्यात सुरू झाल्या असून, त्यात 14 हजार 778 विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविली गेली असून आपल्या मुलाला शाळेत पाठविताना प्रत्येक आईला काळजी वाटते आहे. मुलांच्या आरोग्याबरोबर त्यांचे शिक्षणही महत्त्वाचे असून, काळजावर दगड ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवत आहेत.
कोरोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येते आहे; मात्र ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक अडचणी आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे ण्डॉइड मोबाइल, इंटरनेट, संगणक, लॅपटॉप या गोष्टी असणे आवश्यक आहेत; मात्र ग्रामीण भागात आजही सर्वसामान्य पालकांकडे ण्डॉइड मोबाइल नसतो, मोबाइल असला तर रेंज नसते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तालुकानिहाय सुरू झालेल्या शाळा पुढील प्रमाणे - अकोले 46, संगमनेर 22, कोपरगाव 4, राहाता 24, राहुरी 5, श्रीरामपूर 3, नेवासा 14, शेवगाव 4, पाथर्डी 11, जामखेड 2, कर्जत 1, श्रीगोंदा 4, पारनेर 2, नगर 7
शाळेत मास्क काढू नये. शाळेतून घरी आल्यानंतर शाळेतील कपडे धुण्यासाठी टाकावेत, अंघोळ करावी. शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे. जेवण करण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत. थंडी, ताप जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. शासनाने अवलंबिलेल्या धोरणानुसार, शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येते आहे. पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक निकष पूर्ण करत सामाजिक अंतराचे नियम पाळत शाळा सुरू झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment