नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः नगर पंचायत कर्जतने माझी वसुंधरा 1 मध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला याची बक्षीस रक्कम म्हणून नगरपंचायतला राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. या दोन कोटी रुपयांचा वापर येत्या वर्षभरात कर्जत शहराला पर्यावरण पूरक शहर म्हणून विकसित करण्याकरिता केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली आहे.
माझी वसुंधरा या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या या बक्षीस रकमेच्या सहाय्याने कर्जत शहरांमध्ये सात हरित उद्याने, सुसज्ज अशी रोपवाटिका, रस्त्याच्या दुतर्फा सौरदिवे, शहरामध्ये यापूर्वी लावलेल्या वृक्षांचे संवर्धन, जुने आड बारव यांचे संवर्धन, माझी वसुंधरा अभियान (दोन) अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन इत्यादी गोष्टींसाठी खर्च केला जाणार आहे. आलेला संपूर्ण निधी शहराच्या पर्यावरणीय आरोग्यासाठी व शहर हरित करण्यासाठी वापरला जाणार असल्याने शहराच्या पर्यावरणात येत्या वर्षभरात लक्षणीय बदल होणार आहे.
नागरिकांनी माझी वसुंधरा अभियान दोन मध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन शहर स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी पुन्हा एकदा हातभार लावायचा आहे. माझी वसुंधरा अभियान एक मध्ये नगरपंचायत कर्जत ने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहेत. माझी वसुंधरा अभियान दोन मध्ये मात्र कर्जत नगरपंचायत संपूर्ण नागरिकांच्या सहभागाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवायचा आहे असा निर्धार मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment