किन्ही येथील संतप्त नागरिकांचा बीएसएनएल कार्यालयात ठिय्या !
शनिवार पर्यंत मनोरा दुरूस्त करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित !
नगरी दवंडी
पारनेर प्रतिनिधी :-
तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी , पिंपळगाव तुर्क , करंदी या गावांना दुरसंचारसेवा देणारा बीएसएनएल कंपनीचा मनोरा गोरेगाव घाटमाथ्यावर आहे.सदर मनोरा गेली पंधरा ते वीस दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी किन्ही , बहिरोबावाडी गावातील नागरिकांनी शेतकरी नेते अनिल देठे पाटील व उपसरपंच हरेराम उर्फ मिठू खोडदे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर येथील उपमंडलअभियंता समीर मल्लेभारी यांच्या दालनात एक तास ठिय्या आंदोलन केले.आंदोलनादरम्यान श्री मल्लेभारी यांनी वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करून शनिवार दि.१९ जुन पर्यंत मनोऱ्याचे संपुर्ण दुरूस्तीची कामे पुर्ण करून दुरसंचारसेवा अखंडपणे सुरू केली जाईल.असे आश्र्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी निवेदन देऊन आंदोलन स्थगित केले.या वेळी किन्हीचे माजी सरपंच विठ्ठल आण्णा खोडदे , सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण पवार , माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग व्यवहारे , रामदास देठे पाटील , सुनिल साबळे , राजु देठे पाटील , सुनिल खोडदे , संदिप व्यवहारे , प्रताप खोडदे आदी उपस्थित होते.
किन्ही येथील बीएसएनएलचा मनोरा वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असुन , त्यांना नाहक मनस्ताप होत आहे.त्यामुळे बीएसएनएलने याची गांभीर्याने दखल घेऊन हा मनोरा दिलेल्या मुदतीत दुरूस्त करावा अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
अनिल देठे पाटील
( शेतकरी नेते )
No comments:
Post a Comment