आंदोलनाची हाक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 16, 2021

आंदोलनाची हाक

 आंदोलनाची हाक


राठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आजपासून कोल्हापुरातील राजर्षि शाहू महाराजांच्या समाधीपासून आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. ‘राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं, पण आता गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल,’ असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात छत्रपती संभाजीराजेच्या नेतत्वाखाली मराठा समाज उतरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही आता श्रींची इच्छा आहे, असेच मानून सर्वांनी यातून मार्ग काढायला हवा.
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यापासून संघटनांकडून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या जात आहेत. आता या आरक्षणाच्या लढाईत थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उतरल्याने मराठा समाजाच्या हाती आता काही तरी लागेल अशी आशा वाटू लागली आहे. सातार्याच्या थोरल्या गादीचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरच्या धाकल्या गादीचे संभाजीराजे छत्रपती यांनी आता मराठ्यांसाठी आरपारची लढाई लढण्याचे ठरविले आहे. आता छत्रपतींचे वंशज मराठा आरक्षणाच्या लढाईत उतरल्याने आरक्षण हाती लागावे हीच अपेक्षा. कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सर्वपक्षीय आमदारांना एकत्र आणण्याची किमया दोन्ही राजे करू शकतात. महाराजांचा गनिमी कावा प्रत्यक्षात वापरात आणल्यास राजेंचे वंशज असल्याचा सार्थ अभिमान दोन्ही घराण्यांना वाटेल.
मराठा समाज हा राज्यात सर्वाधिक असूनही शिक्षण आणि नोकर्यांमध्ये उपेक्षितच राहिला. इतर समाजाचे तरुण तरुणी केवळ जातीचे आरक्षण असल्याने त्यांना चांगल्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेता आले. नोकरीतही काही टक्के आरक्षण असल्याने सरकारी नोकरीतही मोठ्या पदावर बसता आले. पण महाराष्ट्रासारख्या राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊनही आणि सर्वाधिक आमदार मराठा असूनही समाजातील मुलामुलींना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण देता आले नाही हे कटू सत्य आहे. मराठा समाजाला जे काही आरक्षण देण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला ते आरक्षण त्यानंतर आलेल्या ठाकरे सरकारला टिकवता आले नाही. यामध्ये ठाकरे सरकारचा दोष नाही तर कोणत्याही राज्यकर्त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे मनातून वाटत नाही. कारण जर तसे असते तर माजी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राग लोभ बाजूला ठेवत विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यातून मार्ग काढण्यासाठी मदत केली असती. ना की कायद्याचा किस काढत ठाकरे सरकारच्या चुकांचा पाढा वाचला असता. तर दुसरीकडे नव्यानेच मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या उद्धव ठाकरे यांनी मोठे मन दाखवत विरोधीपक्ष नेते असलेल्या फडणवीस यांना बोलावून यातून कसा मार्ग काढायचा यावर वन टू वन चर्चा केली असती, तर आता आरक्षणाचे वादळ सरकारवर घोंघावले नसते.
‘मराठा समाजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत भूमिका निभावली होतीच. त्यानंतरसुद्धा परकीय शक्तींचा पाडाव करण्यासाठी मराठा समाजाने आपले सातत्याने बलिदान दिलेले आहे. शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श देश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा कायम ठेवला आहे. आजही मराठा समाज या लोकशाहीचे रक्षण करण्यास सर्वात पुढे आहे. महाराष्ट्राचे हे सह्याद्री पुत्र हिमालयाचे रक्षण करण्यासाठी आपल्या छातीचा कोट करून सीमेवर उभे आहेत. कोल्हापूरच्या छत्रपती संंभाजीराजे यांनी आतापर्यंत कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही आणि ते कधीही पक्षीय भूमिकेत वाहून गेले नाहीत. पण मराठा आरक्षण प्रश्नावर त्यांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. मराठा समाजासाठी वेळ देणे, भेटी घेणे, महाराष्ट्रभर दौरा करणे यामुळे मराठा समाजात त्यांना मोठे स्थान मिळाले आहे. त्यामुळेच विधायक भूमिका घेत मराठा समाजाच्या इतर प्रश्नांकडेही त्यांनी लक्ष द्यायला हवे. समाजाचे आर्थिक, सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी प्रयत्न करताना शिक्षण संस्थांचा दर्जा सुधारावा, शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सरकारला धारेवर धरायला हवे.
आजपासून कोल्हापुरातील राजर्षि शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल. ‘राजसदरेवरुन बोलतोय, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं, पण आता गप्प बसणार नाही, काय होईल ते होईल, असं सांगत संभाजीराजे छत्रपतींनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आरक्षण मूक आंदोलनाला आजपासून पुन्हा सुरुवात होईल. आंदोलनाद्वारे मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँग मार्च काढू,’ असा इशारा संभाजीराजे यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत आणि ऐन पावसाळ्यात पुन्हा एकदा मराठा समाजाचे मोर्चे, आंदोलने काढून सरकारला धारेवर धरण्याची व्यूहरचना दोन्ही राजेंनी आखलेली आहे. त्याला बळ मिळो आणि दोन्ही म्हणजे राज्यातील आणि केंद्रातील राज्यकर्त्यांना सुबुद्धी मिळो. अन्यथा संघर्ष अटळ आहे.
स्वातंत्र्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाला आहे. त्याबाबत आम्ही याच लोकशाही व्यवस्थेत लोकशाही मार्गानेचमराठे हक्क मागत आहोत. न्यायालयीन लढाई, आंदोलने, मोर्चे, चर्चा, लाँग मार्च इ. मार्गाचा समाजाने अवलंब केला. अवघ्या जगाने मूक मोर्चांची दखल घेतली होती. शिवाजी महाराजांचे स्वराज्य अठरापगड जाती, बारा बलुतेदार यांचे होते. यापुढेही सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाण्याची ....आहे.
आरक्षणाचा प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात आणि संसदेत सुटणारा आहे. त्यामुळे राज्यात आंदोलन करुन काहीच फायदा होणार नाही.  बेरोजगारी, शैक्षणिक क्षेत्रातील नुकसान अशा पातळीवर गावागावात मराठा समाज प्रचंड अस्वस्थ आहे. त्यातच मराठा समाजाच्या तरूणांना भडकावत आपली आमदारकी टिकवणारे सर्वपक्षीय नेते उदंड झाल्याने त्यांना घरबंदी करायला हवी. कारण मराठा आरक्षण हा सध्याचा ज्वलंत विषय आहे. मराठा समाजाच्या मतांच्या राजकारणावर मोठा परिणाम होत असल्याने मराठा आरक्षण हा विषय सर्वच राजकीय पक्षांसाठी केंद्रस्थानी राहणार आहे यात शंका नाही.

No comments:

Post a Comment