मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या राजवटीत देश देशोधडीला लागला - आमदार लहू कानडे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या राजवटीत देश देशोधडीला लागला - आमदार लहू कानडे

 मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळ्या राजवटीत देश देशोधडीला लागला - आमदार लहू कानडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मोदी सरकारला नुकतेच सात वर्ष पूर्ण झाले. ही सात वर्षांची राजवट देशातील सर्वात काळी राजवट असून या कालखंडामध्ये देश आणि देशातील नागरिकांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे आ. लहू कानडे यांनी केला आहे.
मोदी सरकारचा सात वर्षातील काळया राजवटीच्या निषेधार्थ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून अहमदनगर शहरामध्ये आ. लहू कानडे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी पुतळा, वाडिया पार्क याठिकाणी महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रशासनाच्या नियमांचे पालन करून तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे, नगर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलिल सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, महिला सेवादल काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष कौसरताई खान, शहर जिल्हा सचिव मुबिन शेख, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, शहर जिल्हा सहसचिव गणेश आपरे विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजित जगताप, युवक काँग्रेसचे विशाल घोलप, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.
आ. कानडे म्हणाले की, सात वर्षांमध्ये मोदी सरकारने देशाला काळोखात ढकलण्याचे काम केले. देशामध्ये पेट्रोलचे भाव भडकले आहेत. डिझेलचे दर वाढले आहेत. गॅसच्या किमती या सामान्य माणसाच्या परवडण्याच्या कक्षे पलीकडे गेलेल्या आहेत. काँग्रेसने संघर्ष करून, चळवळ करून देश उभा केला. जगात प्रतिष्ठा निर्माण केली. अनेक लोकहिताच्या संस्था निर्माण केल्या. या संस्थाच मोडीत काढण्याचे काम मोदी सरकारने केले. नवरत्न कंपन्यांना विकण्याचा सपाटा मोदी सरकारने लावला आहे.
जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले की, मोदी सरकारची कार्यपद्धती ही तुघलकी पद्धतीची आहे  सर्वसामान्यांचे कोरोना संकट काळात कंबरडे मोडण्याचे काम यांनी केले. ऑक्सिजन उपलब्ध करून दिला नाही. इंजेक्शन, औषधे महाराष्ट्राला उपलब्ध करून दिली नाहीत. लसीकरणाच्या बाबतीमध्ये गुजरातला झुकते माप देत तसेच भाजपशासित राज्यांत प्राधान्य दिले गेले. मात्र महाराष्ट्रावर अन्याय करत राजकीय द्वेषातून महाराष्ट्राला पुरेशा लसी दिल्या नाहीत.
ज्ञानदेव वाफारे म्हणाले की, मोदी सरकारची कार्यपद्धती ही समाजाच्या हिताची नसून देशामध्ये आज निर्माण झालेली संतापाची भावना हीच मोदी सरकारला उलथवून टाकण्याचे काम भविष्यात करेल. आज सामान्य नागरिक हा पीचला गेला असून शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, उद्योजक, व्यापारी वर्ग सर्वच स्तरांमध्ये मोदी सरकार बद्दल तीव्र संतापाची भावना आहे.

No comments:

Post a Comment