गोपीनाथ मुंडे नाहीत म्हणून सत्ता गेली - महादेव जानकर.
गोपीनाथ गडावर पुण्यतिथीनिमित्त ऑनलाइन कार्यक्रम.
परळी - गोपीनाथराव हे सामान्य माणसाला घडवणारे महानायक होते. मी पंकजा मुंडे यांच्या सुखाऐवजी दुःखात जास्त सहभागी आहे. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो. तसा मी झालो. मुंडे साहेब आज असते, तर सत्तेत विभाजन झालं नसतं. मुंडे साहेब बापमाणूस होते, गोपीनाथराव नाहीत म्हणून सत्ता गेली. मात्र राष्ट्रीय समाज पक्ष एनडीए सोबत आहे. गोपीनाथ मुंडे आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. येत्या काळात ओबीसींचं नेतृत्व हे पंकजा मुंडेंनी करावं आणि पंकजा ते करत आहेत. ओबीसींच्या कोट्यातून इतर कोणालाही आरक्षण देता कामा नये. गोपीनाथ रावांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालं, त्याची जाणीव ही पदोपदी येते.’ अशा भावना रासप नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी रासप नेते महादेव जानकर यांनी बीडमधील परळी येथे गोपीनाथ गडावर हजेरी लावली. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो, अशा भावना जानकरांनी यावेळी व्यक्त केल्या.
राज्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसींनी या राज्याची सत्ता हाती घ्यावी, सत्तेत ओबीसी असल्याशिवाय ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत. ओबीसींनो, सत्तेत या ही आमची भूमिका आहे, सगळ्या जातींना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला हात लागता कामा नये’ अशी भूमिका जानकरांनी मांडली.
No comments:
Post a Comment