मराठा आरक्षण । 36 जिल्ह्यात आंदोलन
करण्याची इच्छा नाही, पुढची दिशा आज ठरणार.नाशिक ः मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी मार्गी लावल्या पाहिजेत. आम्हाला 36 जिल्ह्यात आंदोलन करण्याची इच्छा नाही. आजचं मूक आंदोलन संपल्यानंतर राज्य समन्वयकांची बैठक होणार आहे. त्यात आज (21 जून) संध्याकाळी पुढची दिशा ठरवली जाणार आहे, अशी घोषणा खासदार संभाजी छत्रपती यांनी आज केली आहे. खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात आज नाशिकमध्ये मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला नाशिकमधील लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर संभाजी छत्रपती यांनी ही घोषणा केली. आरक्षणसााठी ज्या समाजाने 58 मोर्चे काढले. तो समाज आज बाजूला फेकला गेला आहे. जातीय विषमताही वाढत आहे. त्यामुळे आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे. समाजाने दु:ख मांडलं. त्यामुळे पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरवायचे का? असा सवाल करतानाच आक्रोश करायला, मोर्चे काढायला दोन मिनिटं लागतात. पण तसं न करता आजवर आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधींनी बोलावं म्हणून हे आंदोलन केलं जात आहे, असं संभाजी छत्रपती यांनी सांगितलं आहे.
लोकप्रतिनिधींनी आपआपली जबाबदारी घ्यावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. बहुजन समाज कसा एकत्र होईल यासाठी माझा प्रयत्न आहे. आरक्षणाचे काय पर्याय उपलब्ध आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे, असं सांगातनाच पुनर्विचार याचिका आणि आयोग स्थापन करणं हे पर्याय आहेत, असं त्यांनी सांगितलं. संभाजीराजे भोसले म्हणाले, समन्वयकांना आणि जे राज्यातून आलेले आहेत. जे समाजाचे घटक आहेत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे. मी इतकंच सांगेन की, आपण जे आंदोलन पुकारलं आहे, ते मूक आंदोलन आहे. समाज बोलला आहे. आम्ही बोललो आहोत. आता लोकप्रतिनिधींनी आपलं मत व्यक्त करावं. ते काय जबाबदारी घेणार, हे सांगावं. समन्वयकांनी आणि इतरांनी उलट प्रश्न करू नये. पक्षाशी संबंधित न बोलता लोकप्रतिनिधींनी समाजाला न्याय देण्यासाठी काय करू शकता, समाजाची कोणती जबाबदारी घेणार, हे सांगावं. कोणत्याही राजकीय पक्षाला विरोध नाही. आपली भूमिका सांगावी, आम्ही बोलणार नाही, अशी भूमिका यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली.
No comments:
Post a Comment