कोरोनाचे संकट टळो..पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो...!
कोरोना उच्चाटणासाठी वटपौर्णिमेला ’सावित्रीं’चे देवाला साकडे
नगरी दवंडी/अविनाश निमसे
अहमदनगर ः ‘कोरोनाचे संकट टळो व पतीसह सर्व कुटुंबाला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’ अशी आर्त प्रार्थना करत सौभाग्यवाती महिलांनी वटपौर्णिमा सणा निमित्त वडाला सात फेरे घालत कोरोनोच्या समूळ उच्चाटणासाठी देवाला साकडे घातले. दर वर्षी जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेस वट सावित्रीचे व्रत केले जाते. वास्तविक वटपौर्णिमा सणाला सौभाग्यवाती महिला आपल्या पतीच्या दीर्घाआयुष्यासाठी तसेच जन्मोजन्मीची साथ लाभावी यासाठी व कुटुंबात सुख शांती नांदावी यासाठी पार्थना करतात. परंतु कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे आता याजन्मीचीच शाश्वती राहिली नसून अनेकांचा ‘अर्ध्या वरती डाव’ मोडला आहे.
गेल्या वर्षभरा पासून कोरोना सारख्या महाभयंकर साथरोगाने जगभरात थैमान घातले. महामारीने कुटुंबातील कर्ती माणसे गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. तर कुटंबची कुटूंबे उध्वस्त झाल्याने क्षणात सर्व काही होत्याचे नव्हते झाले. वटपौर्णिमेला सावित्रीने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने तसेच चिकाटी व चातुर्याने यमधर्मापासून पतीचे प्राण वाचविले असल्याची अख्यायिका सर्वश्रुत आहे. आधुनिक काळात हे शक्य नसले तरी देवाच्या प्रार्थनेने हे संकट निश्चित टळेल अशी आशा व्यक्त करत सोभाग्यवती महिलांनी गुरुवारी वटपौर्णिमेचे औचित्य साधत पतीच्या दीर्घाआयुष्यासाठी देवाला साकडे घातले.
No comments:
Post a Comment