धक्का मारो आंदोलन! महागाईविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे वाढवलेले दर व राज्य सरकारने वाढवलेले वीज बिल व खाद्यतेलाच्या दरवाढीविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने धक्का मारो आंदोलन करण्यात आले. वाहनांना धक्का देऊन शहरातून मोर्चा काढण्यात आला. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. आंदोलकांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन दुचाकी व रिक्षांना धक्का देत शहरातून मोर्चा काढला. माळीवाडा येथे महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविण्यात आला. वाहनांना धक्का देत आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले. 2014 पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी महागाईचा बकासुर निर्माण केला आहे. गेल्या सात वर्षापासून महागाई कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असून, सर्वसामान्यांना जगणे अवघड झाले आहे. त्यात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीचा भडका उडाला आहे. यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे. एकीकडे टाळेबंदी असल्याने लोकांचे दरडोई उत्पन्न घटले आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी जनता जिवाचे रान करत आहे. तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. केंद्रातील भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. गेल्या काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. न्यूयार्क पेक्षाही भारतात पेट्रोल महाग झाले आहे. दैनंदिन जीवनात गरजेचे असलेले पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती वापराचे गॅसच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असताना त्यावेळेस सर्वसामान्य जनतेला इंधन, तेलाच्या किमती कमी होण्याची आशा होती, पण तसे न होता किमती वाढतच राहिल्या. सर्व सामान्य जनतेची लूट करण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क वाढविले. परिणामी पेट्रोल, डिझेल गॅसचे किंंमती कमी होण्याऐवजी वाढले आहेत. भाजप सरकारने जनतेचे पंचवीस लाख कोटी रुपये टॅक्सच्या नावाने लुटले. पूर्वी गॅसची सबसिडी मिळत होती, आता सबसिडी न देता जनतेला खुल्या किमतीत गॅस खरेदी करावा लागत आहे. गॅसची किंमत 930 झाली आहे. पूर्वी गॅस तीन महिने चालत होता. आता तोच गॅस एक महिन्यात संपतो. याचा अर्थ गॅस कंपनीने पैसा वाढवून गॅसची घनता कमी केली. अशा दोन्ही बाजूने जनतेची लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी कराव्या, खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव कमी करावे, वीज बिल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन प्रमुख पदाधिकार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर, बाळासाहेब पातारे, मनोहर वाघ, गणेश चव्हाण, राधेलाल नकवाल, किरण सोनवणे, सुधीर खरात, ह.भ.प. घुगे महाराज, अजय साळवे, प्रताप सौदे, जहीर सय्यद, सागर ठाणगे, यश साळवे, कन्हैय्या गट्टम, बी.आर. गोहेर, दादाभाऊ पटेकर, हनिफ शेख, कानिफ आंबेडकर आदी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment