वाढत्या राजकीय दबावामुळे आरोग्ययंत्रणा मानसिक ताणतणावाखाली
रात्री अपरात्री फोनवर वापरली जाते दबावतंत्राची भाषा l आरोग्याधिकाऱ्यांचे प्रातांधिकारी यांना निवेदन
नगरी दवंडी / प्रतिनिधी
अहमदनगर - कोविड महामारीच्या काळात कामकाज करत असताना आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांच्यावर गावपुढऱ्यांपासून ते जिल्हापातळीवरील पुढऱ्यांचा दबाव वाढत चालला असून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी मानसिक ताण तणावाखाली काम करत असल्या बाबतचे निवेदन आरोग्य विभागातर्फे नुकतेच प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोविड महामारीच्या काळात मागील एक वर्षाच्या कालावधी पासुन कोणतीही सुटटी न घेता तसेच घरातील व्यक्ती अथवा नातेवाईक आजारी असतानाही आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी नियमितपणे कामकाज करत आहेत.
तथापी आरोग्य सेवेचे कामकाज करत असताना ज्या व्यक्तींना लस साठा तपासणीचा अधिकार नाही अशा व्यक्ती डी फ्रीजर मध्ये हात घालुन लस आहे किंवा नाही हे बळजबरीने पहाणे, अॅन्टीजन टेस्ट करताना, पॉझीटीव्ह रुग्णांना अॅडमिट करताना शासकीय निकषाप्रमाणे कामकाज होणे अपेक्षित असताना त्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न ग्रामपातळी ते जिल्हापातळीवरील कार्यकर्ते नेते मंडळी करत असल्याचे जाणवत आहे. तसेच पॉझीटीव्ह रुग्ण मयत झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी आरोग्य विभागास जबाबदार धरले जात असल्याचा प्रकार घडत आहे. त्याचप्रमाणे पुढऱ्यांकडून अधिकारी-कर्मचारी यांना रात्री अपरात्री, दुरध्वनीवरून दबावतंत्राची भाषा वापरली जात आहे. त्यामुळे आरोग्ययंत्रणेचे मनोबल खच्चीकरण होत आहे. तसेच आरोग्य विभागातील महिला अधिकारी-कर्मचारी यांना वेळी अवेळी फोन करुन दबावाची भाषा वापरली जात आहे. ही बाब सामाजिकदृष्ट्या अयोग्य असून आरोग्ययंत्रणेचे मनोबल वाढविण्यासाठी आपल्या स्तरावरून सहकार्य करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, डाॅ. अनिल ससाणे, डॉ. भारत कोठुळे, डॉ. निवेदिता माने, डॉ. रश्मी शिंदे, डॉ.शुंभागी पवार, डॉ. प्रियंका पवार डॉ. प्रिंयका शेंदुरकर, डॉ.कल्पना पोहरे, डॉ. सुप्रिया थोरबलेसह आदी डॉक्टर्स उपस्थित होते
No comments:
Post a Comment