विडी कामगारांना पाच हजार भत्ता द्या - सौ.वीणा बोज्जा यांचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र
नगरी दवंडी
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी देश तीन मे पर्यंत लॉकडाऊन आहे. या काळात विडी कामगारांच्या हाताचे काम थांबले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नगर शहर व जिल्ह्यातील हातावर पोट असलेल्या हजारो विडी कामगारांना राज्य शासनाने प्रोत्साहन भत्ता द्यावे म्हणून श्रमिकनगर मधील सामाजिक कार्यकर्ते व स्त्री जन्माचे स्वागत चे प्रवर्तक नरेश कोटा हे उपोषणास बसले असून आज पाचवा दिवस असून प्रशासनाने अदयाप पावेतो कोणतीही भूमिका घेतली नाही अगर मदत जाहीर केले नाही ही शोकांतिका असून प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा व बिडी कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा अशी मागणी मा. नगरसेविका सौ.वीणा बोज्जा यांनी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे.
तेलांगणा सरकारने विडी कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा जीवनभत्ता जाहीर केला आहे. महाराष्ट्र शासनानेही बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये भत्ता जाहीर केला आहे. राज्य सरकारकडून राज्यातील सुमारे दीड लाख विडी कामगार मात्र दुर्लक्षित राहिले आहे. विडी कामगार हे हातावर पोट असलेले नागरिक असून त्यांना उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. लॉक डाऊनच्या काळात विडी उद्योग बंद झाला आहे. त्यामुळे विडी कामगार हाताला काम नसल्याने घरात बसून आहेत. या परिस्थितीत त्यांना आर्थिक सहाय्य मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे बोज्जा यांनी नरेश कोटा यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा व्यक्त करून थेट कामगार मंत्री दिलीप वळसे यांना पत्र पाठवित आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे.
विडी कारखानदारांनीही द्यावी मदत
विडी उद्योग कारखानेही लॉकडाऊनमध्ये बंद आहेत. वर्षानुवर्षे पोटासाठी काम करणाऱ्या कामगारांना विडी कारखानदारांनीही आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. विडी कारखानदारांनी कामगारांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. स्वत: कारखानदारांची व शासनाची अशी मिळून मोठी मदत कामगारांना होईल अशी अपेक्षा सौ वीणा बोज्जा यांनी व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment