याचिका मागे : कुकडीचे आवर्तन लवकरच !
आ. नीलेश लंके यांची माहीती : लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंद !
नगरी दवंडी
पारनेर प्रतिनिधी
कालवा सल्लगार समितीने ९ मे पासून कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका याचिकाकर्ते प्रशांत औटी यांनी सोमवारी मागे घेतल्याने कुकडी प्रकल्पाच्या आवर्तनाचा मार्ग मोकळा झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर कुकडीचे आवर्तन सोडण्याची मागणी पारनेर तालुक्यासह लगतच्या श्रीगोंदे, कर्जत तसेच सोलापूर जिल्हयातून करण्यात येत होती. त्या पार्श्वभुमिवर पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ९ मे पासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होती. परंतू आठमाही कालवा असल्याने शेतीसाठी पाणी सोडता येणार नाही, तसेच धरणातील मृत साठा या पार्श्वभुमिवर जुन्नर जि. पुणे येथील शेतकरी प्रशांत औटी यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत कुकडी कालवा समितीच्या निर्णयास स्थगिती मिळविली होती.
मुळातच आवर्तन सोडण्याचा निर्णय उशिराने झाल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. आवर्तन लवकर सोडण्यासंदर्भात आ. लंके यांनी प्रकल्पाचे अधिकारी तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी अनेकदा दुरध्वनीवरून चर्चा केली होती. अधिकारी तसेच जलसंपदा मंत्र्यांची भेटही घेतली होती. त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आवर्तन पुन्हा लांबणीवर पडले होते.
याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणीही झाली मात्र न्यायालयाने त्यावेळी निर्णय दिलेला नव्हता. सोमवारी या याचिकेवर सुनावणी ठेवण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीच याचिकाकर्ते प्रशांत औटी यांनी आपली याचिका मागे घेतल्याने आता कुकडी आवर्तनाचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशांत औटी यांनी याचिका दाखल केल्यानंतर आवर्तन सोडण्यास न्यायालयाने मनाई केली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी आ. लंके यांनी मंत्री पाटील यांना साकडे घातले होते. जुन्नर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके यांच्या मार्फत मंत्री पाटील यांनी याचिकाकर्ते औटी यांच्याशी चर्चा केली. त्यात तोडगा निघाल्यानंतर औटी यांनी आपली याचिका मागे घेतल्याचे सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment