स्व. राजीव गांधींचे कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचवावे
आ.प्रणिती शिंदे ः स्व.गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेसची ऑनलाईन अभिवादन सभा संपन्न
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.राजीव गांधी यांनी देश उभारणीसाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्याच काळात भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली. आजचा टेक्नॉलॉजीकली प्रगत भारत हा त्याचेच विस्तारित रूप आहे. स्व.राजीवजींचे कार्य आजच्या तरुण पिढीपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोहोचवावे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. प्रणितीताई शिंदे यांनी केले आहे.
स्व.गांधी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या स्मृतिदिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन अभिवादन सभेत त्या बोलत होत्या. या सभेला आ. डॉ. सुधीर तांबे यांनी देखील संबोधित केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे, अहमदनगर ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिरालाल पगडाल, अंकुशराव कानडे, महिला प्रदेश महासचिव उत्कर्षाताई रूपवते, नगर शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, नगर शहर सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष सौरभ रणदिवे आदींसह शहर काँग्रेसचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने ऑनलाईन सभेत सहभागी झाले होते.
आ. शिंदे म्हणाल्या की, राजीव गांधींच्या काळात शहरांसह गावांचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. त्यामुळे भारताची जगामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम झाले. राजीवजींचा आदर्श समोर ठेवत काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोरोना संकट काळात रस्त्यावर उतरत समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे. या उलट विरोधी पक्ष काम करत करताना दिसत नसून केवळ शो बाजी सुरू असल्याचे दिसत आहे. आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, राज्यघटनेच्या माध्यमातून भारतातील सामाजिक क्रांती झाली. त्यात राजीवजी यांचा कालखंड हा महत्त्वपूर्ण राहिला आहे. ते आजवरचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. त्यांच्या काळात अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय काँग्रेस पक्षाने सरकारच्या माध्यमातून घेतले. पंचायतराज कायदा करून त्या माध्यमातून सत्तेचे विकेंद्रीकरण करत समाजातील प्रत्येक घटकाला नेतृत्व करायची संधी त्यांनी निर्माण करून दिली. यावेळी किरण काळे, बाळासाहेब साळुंखे, हिरालाल पगडाल आदींची भाषणे झाली. ज्ञानदेव वाफारे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
ना.थोरात राज्यातील बलाढ्य नेते- आ. शिंदे
महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. गेली अनेक दशकं ते विधानसभेत काम करीत आहेत. ना. थोरात हे काँग्रेसचे राज्यातील बलाढ्य नेते आहेत, असे प्रतिपादन यावेळी कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांनी केले.
No comments:
Post a Comment