"अवकाळीने शेतमालाचे मोठया प्रमाणात नुकसान"
मुख्य यार्डात फळे भाजीपाला सुरु करण्यासाठी सभापती घिगे यांची मागणी
नगरी दवंडी / प्रतिनिधी
अहमदनगर : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतातील भाजीपाला खराब होऊन मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करून बी बियाणे, खते, औषधे,वेळेत मिळणे गरजेचे असल्याने बाजार समितीच्या मुख्य यार्डात फळे भाजीपाला, भुसार बाजार व नेप्ती उपबाजारात कांदा फळे व भाजीपाला बाजार सुरु करण्यात यावा अशी मागणी बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात घिगे यांनी म्हटले आहे की, कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. 18 मे ते 31 मे पर्यंत सर्व व्यवहार बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी विभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार दि. 15 मे पर्यंत बाजार समितीच्या मुख्य आवरातील अन्नधान्य, फळे, भाजीपाला व इतर व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्य बाजार व नेप्ती उपबाजार सुरु केल्यास शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल विक्री करून मिळणाऱ्या पैशातून त्यांना बी बियाणे व इतर आवश्यक शेतीपूरक वस्तू खरेदी करता येईल. बाजार समिती मार्फत आडते, व्यापारी, शेतकरी, हमाल, मापारी यांना कोव्हीड नियमांच्या सूचना देऊन अंमलबजावणी करता येईल. तरी मुख्य बाजार व नेप्ती उपबाजारात फळेभाजीपाला, भुसार कांदा सुरु करण्यासाठी ठराविक वेळेची मर्यादा देऊन परवानगी द्यावी अशी मागणी सभापती अभिलाष घिगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment