28 मे ला अहमदनगर स्थापना दिन.. मनपाने साजरा करावा ः फुलसौंदर
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहराचा 531वा स्थापना दिन येत्या 28 मे रोजी आहे. या शहराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेने स्थापना दिनी कोरोनामुळे ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करावा, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.
सोळाव्या शतकात जगातील सुंदर शहरांत आपल्या शहराची गणना होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे, वडील शहाजीराजे, राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव ही सगळी मंडळी निजामशाहीतच आपल्या कर्तृत्वानं मोठी झाली. इतिहासाचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला, बागरोजा, फराहबख्क्ष महाल यांसारख्या वास्तु शहर व परिसरात आहेत. माळीवाडा वेशीजवळील श्री विशाल गणपती, मेहेराबाद, आनंदधाम, वेदांत दत्त देवस्थानसारखी महत्त्वाची धार्मिक स्थळं इथं आहेत. पर्यटनाला चालना दिली, तर नगर शहरातील आर्थिक उलाढाल व रोजगाराच्या संधी वाढायला मदत होईल. सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे जाहीर कार्यक्रम घेता येत नाहीत. तथापि, ऑनलाइन कार्यक्रम घेऊन या शहराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबर भविष्यातील योजनांचे नियोजन करता येऊ शकेल, असे फुलसौंदर यांनी सांगितले.
यावेळी इतिहास संशोधक भूषण देशमुख, उपक्रमशील शिक्षक सतीश गुगळे, इतिहासप्रेमी पंकज मेहेर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment