महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा इशारा; धार्मिक कार्यावर बंदी घालणार 20,000 मानधन द्या. अन्यथा रस्त्यावर उतरू! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा इशारा; धार्मिक कार्यावर बंदी घालणार 20,000 मानधन द्या. अन्यथा रस्त्यावर उतरू!

 महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा इशारा; धार्मिक कार्यावर बंदी घालणार 

20,000 मानधन द्या. अन्यथा रस्त्यावर उतरू!


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः आज पासून सलून व ब्युटी पार्लर बंद करण्याचा राज्य शासनाचा निर्णय म्हणजे नाभिक समाजावर मोठा आघात आहे. सर्व आस्थापनांना व गर्दीच्या ठिकाणांना सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत सवलत असताना आमच्यावरच अन्याय का? सलून व ब्युटी पार्लरांनाच का टार्गेट केलं जात आहे? संपूर्ण महिनाभर आमचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला हा आमचेवर अन्याय आहे. प्रत्येक कारागीरास 20,000 रू. मानधन द्या अन्यथा आम्ही दशक्रिया विधी सह सर्व धार्मिक कार्यक्रमांवर बहिष्कार टाकू व सहकुटुंब व परिवारासह रस्त्यावर येवू असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
   याप्रसंगी जिल्हाध्यक्षा शांताराम राऊत, उत्तर विभागीय सरचिटणीस सुनिल वाघमारे, राज्य कार्य.सदस्य विकास मदने, जिल्हा सलून चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष जनार्दन वाघ, युवा जिल्हाध्यक्ष शरद दळवी, शहराध्यक्ष विशाल मदने आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी लॉकडाऊन जसा सुरु झाला, तेव्हापासून महाराष्ट्रातील सलून व्यवसाय मोडकळीस आला आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही शासनाकडे बिहार, आंध्रप्रदेश, राज्यस्थान या राज्यामध्ये सलून व्यवसायाला ज्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ही 20,000/- आर्थिक मदत करावी. तसेच गाळा भाडे, लाईट बील माफ करण्यात यावे. यासाठी नगर शहरामध्ये आमरण उपोषण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरुपाचे आंदोलन झाले. नगर येथील उपोषण ना.ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच आ.संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत स्थगित करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पहिल्या कॅबिनेटमध्ये समाजाचे प्रश्न सोडविले जातील. योग्य तो आर्थिक मोबदला दिला जाईल, असे आश्वासन दिले, आज पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.
   सलून आणि ब्युटी पार्लर या संदर्भात आपण 30 एप्रिल पर्यंतची जी बंदची घोषणा केली आहे. त्याबाबत आपण नाभिक समाजावर एक प्रकारचा मोठा आघात केलेला आहे, आपण सर्व आस्थापनांना व गर्दी होणार्या ठिकाणांना काम करण्याची सकाळी आठ ते सायंकाळी सात पर्यंत सवलत दिलेली आहे. मग सलून व ब्युटी पार्लर व्यावसायिकच आपण टार्गेट करीत आहात. आमच्या सलूनमध्ये आम्ही गर्दी होऊ देत नाही व जवळून जरी काम करत असलो तरी सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून काम करतो. तसेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आम्ही आमचे व्यवसाय अतिशय काळजीपूर्वक, सर्व सुरक्षिततेचे नियम पाळून करत आलेलो आहोत. आम्हालाही आमच्या जीवाची पर्वा आहे. सलून व्यववसायिक हा पोटावर हात असणारा आर्थिक परिस्थिती नाजूक असतांना रोजची गुजरण करत आहे. दिवसभरात केलेल्या कामावर तो आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत असतो. त्यात इतका मोठा बंद म्हटल्यानंतर त्यांच्या कुटूंबावर उपासमारी शिवाय किंवा आत्महत्याशिवाय पर्याय नाही. आम्ही व्यवसाय आठ दिवसांपर्यंत बंद ठेवणे सहाजिक आहे. हे संपूर्ण महिनाभर बंद ठेवणे म्हणजे आमच्यावर अन्याय आहे. त्यामुळे शासनाने प्रत्येक कारागीरास रु. 20,000 /- मानधन देण्यात यावे. तसेच आम्ही सलून दुकान बंद ठेवू अन्यथा येणार्या काळात आम्ही सहकुटूंब व सहपरिवार रस्त्यावर येऊ, असेही निवेदनात म्हटले आहे.
   निवेदनावर शिवाजी दळवी, अरुण वाघ, बापू क्षीरसागर, नासिर शेख, इम्रान शेख, अब्दुल रहेमान, सतीश साळूंके, अशोक खामकर, सुरेश राऊत, राजेंद्र ताकपेरे, दिपक बिडवे, बाळासाहेब शेजूळ, गणेश कदम, अजय कदम, सुनिल खंडागळे, संतोष वाघमारे आदिंसह सलून व्यवसायिकांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment