रिकामटेकड्यांकडून नियमांचे उल्लंघन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, April 13, 2021

रिकामटेकड्यांकडून नियमांचे उल्लंघन.

रिकामटेकड्यांकडून नियमांचे उल्लंघन.

822 जणांना 4 लाख 20 हजारांचा दंड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. रुग्णालयात बेड मिळत नाहीत, इंजेक्शन उपलब्ध होत नाहीत. अशा भयानक परिस्थितीत प्रशासन ही साथ आटोक्या त आणण्याचे कसोशीने प्रयत्न करत असताना काही रिकामटेकडे मात्र नियमांचे उल्लंघन करण्यातच धन्यता मानत आहेत. संचारबंदी असतानाही किराणा संपलाय, भाजीपाला आणायला चाललोय, गावाकडे अर्जंट जायचे आहे, पोटदुखीच्या गोळ्या घ्यायच्यात, असे एक से बढकर एक कारणे सांगत विनाकारण रस्त्यावर भटकंती करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वीकेंड लॉकडाउनच्या काळात शनिवार व रविवार असे दोन दिवस पोलिसांनी शहरासह जिल्हाभरात 822 जणांना 4 लाख 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार अशी दोन दिवस संचारबंदी लागू केली होती. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार करण्यास बंदी होती. शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांनी या संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरीच थांबणे पसंत केले. काही जणांनी मात्र हा आदेश गांभीर्याने न घेता काहीतरी कारण काढून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मग पोलिसांनीही अशा रिकामटेकड्यांवर कारवाईचा बडगा उगारत त्यांना चांगलाच दणका दिला. संचारबंदीत तपासणी दरम्यान पोलिसांना बहुतांश जणांनी हॉस्पिटल व मेडिकलमध्ये जात असल्याचे कारण सांगितले. औषधे आणायला मात्र एका मोटारसायकलवर दोन ते तीन जण जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अशावेळी पोलिसांनी त्यांना समज देत एकाच व्यक्तीला जाण्याची परवानगी दिली. बहुतांश जणांनी खोटी कारणे सांगून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 414 जणांना 2 लाख 18 हजार 800 रुपयांचा दंड करण्यात आला. तर रविवारी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 408 जणांना 2 लाख 74 हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

No comments:

Post a Comment