प्रधानमंत्री अन्न योजने'द्वारे जिल्ह्यास मिळणार ३१ हजार टन मोफत धान्य - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, April 29, 2021

प्रधानमंत्री अन्न योजने'द्वारे जिल्ह्यास मिळणार ३१ हजार टन मोफत धान्य

 प्रधानमंत्री अन्न योजने'द्वारे जिल्ह्यास मिळणार ३१ हजार टन मोफत धान्य



 नगरी दवंडी

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जारी असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना नियमीत लाभाव्यतिरिक्त आता प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे प्रति सदस्य प्रतिमहिना ५ किलो याप्रमाणे मे व जून या दोन महिन्याचे धान्य मोफत दिले जाणार आहे. या निर्णयानुसार नगर जिल्ह्यातील ३१ लाख ४६ हजार ९६ लाभार्थ्यांना दोन महिन्याचे एकूण ३१ हजार ४६२ मेट्रीक टन धान्य मोफत मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या निर्देशानुसार पुरवठा विभागामार्फत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली.

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्याच्या हेतूने जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी सुरु आहे. या काळात गरजूंना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रीकाधारकांना एक महिन्याचे नियमीत असलेले धान्य मोफत वाटप केले जाणार आहे. एक महिना मोफत धान्याचा लाभ जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबमधील एकूण ६ लाख ७९ हजार ३६९ शिधापत्रीकाधारकांना होणार आहे. अंत्योदय अन्न योजनेत प्रति शिधापत्रीकानिहाय प्रतिमहिना ३५ किलो धान्य दिले जाते. तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रीकाधारकांना शिधापत्रीकेतील व्यक्तीनिहाय ५ किलो धान्य स्वस्त दरात दिले जाते. राज्य सरकार पाठोपाठ कोरोना प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययास गरीबांना सामोरे जावे लागत असल्याचे लक्षात घेत केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत सार्वजनीक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना मे, जूनसाठी प्रतिसदस्य प्रतिमहिना ५ किलो धान्य दिले जाणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेतील सदस्य संख्या ४ लाख ३२ हजार ७८९ आणि प्राधान्य कुटुंब सदस्य संख्या २७ लाख १३ हजार ३०४ अशी एकूण ३१ लाख ४६ हजार ९६ इतकी आहे.

No comments:

Post a Comment