एकाच फोनवर गाव होणार अलर्ट
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः गावात घडणार्या विविध गुन्ह्याप्रसंगी ग्रामस्थाची मदत होण्याच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा यंत्रणा चोर्या, दरोडे, आगीच्या किंवा इतर घटनां वर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस दलासाठी रामबाण उपाय ठरु शकते. याचे प्रात्यक्षिक कर्जत येथे विविध गावचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांना दाखविण्यात आले.
कर्जत, जामखेड तालुक्यात इतर तालुक्याचे मानाने चोर्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये वेळेत मदत न पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर शारीरिक तसेच आर्थिक नुकसान होते. यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा हा चांगला पर्याय ठरणार आहे. याचे प्रात्यक्षिक आज कर्जत पोलिसांनी पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यासाठी ठेवले होते. तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्र शेखर यादव, गट विकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी नगरपंचायत गोविंद जाधव, सपोनी सुरेश माने यांच्या उपस्थितीत ग्राम सुरक्षा यंत्रणेचे डी के गोरडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. सदर ग्राम सुरक्षा यंत्रणेने च्या माध्यमातून चोरी दरोडे ची घटना गंभीर अपघात निधन वार्ता आग जळीताची घटना विषारी सर्प दंश विषारी साप घरात घुसणे पिसाळलेला कुत्रा गावात येणे बिबट्याचा हल्ला लहान मुली हरविणे महिलांची छेडछाड वाहनचोरी शेतमालाची चोळी रेशन रॉकेल यांचे गावात सुरू झालेली वितरण ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या योजना व सार्वजनिक कार्यक्रम गावातील शाळांकडून दिल्या जाणार्या सूचना सरकारी कार्यालयाकडून दिल्या जाणार्या सूचना पोलिस यंत्रणेकडून देण्यात येणार्या सूचना एकाच वेळी गावातील सर्वाना देता येणार आहे. या वेळी सर्वांकडून एक डेमो करून घेण्यात आला. डेमो केल्यावर सर्वांना सदरची ग्रामसुरक्षा यंत्रणा ही अतिशय उपयुक्त असल्याचे जाणवले. सदर यंत्रणेमध्ये गावातील, परिसरातील, तालुक्यातील, प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे मोबाईल नंबर रजिस्टर केले जातील. मोबाईल नंबर रजिस्टर केल्यावर कोणत्याही प्रसंगी घटना स्थळावरील व्यक्तीने किंवा त्यांच्या शेजारील कोणत्याही व्यक्तीने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांकावर आपले नाव, गाव सांगून काय घटना घडली हे थोडक्यात सांगायचे आहे. असे सांगितल्यावर तात्काळ एकाच वेळेस परिसरातील सर्वांना फोन जातो आणि ज्या आवाजामध्ये माहिती टोल फ्री क्रमांकावर दिली आहे, त्याच व्यक्तीच्या आवाजात संबंधित त्या गावातील सर्व लोकांना काही वेळातच फोन येतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर आगीच्या, अपघाताच्या ठिकाणी तत्काळ मदत पोहोचते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तीय व जीवित हानी टळली जाते. सदरची ग्राम सुरक्षा यंत्रणेचा पुणे, नाशिक तसेच इतर जिल्ह्यांमध्ये प्रभावीपणे वापर सुरू आहे. सदर यंत्रणा सुरु होण्यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी मदत व मार्गदर्शन करून पुढाकार घेतला आहे. कर्जत तालुक्यातील सर्व गावांनी सदर यंत्रणा सुरू करून प्रभावी वापर करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment