कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय नियम पाळा : आ. पाचपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, March 30, 2021

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय नियम पाळा : आ. पाचपुते

 कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय नियम पाळा : आ. पाचपुते


नगरी दवंडी/प्रतिनिधी

श्रीगोंदा ः अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, श्रीगोंदा तालुक्यात सध्या180 च्या आसपास कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक, कार्यकर्ते आणि तलाठी यांनी सतर्क राहून आपापल्या गावातील वस्तुस्थिती दर्शक माहिती प्रशासनाला द्यावी. असे आवाहन माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी कोविड-19 च्या श्रीगोंदा तालुक्याच्या आढावा बैठकीत दिली.
या बैठकीला परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा श्रीगोंद्याच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, गट विकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संघर्ष राजुळे, प्रा. तुकाराम दरेकर, बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके, संतोष खेतमाळीस, संतोष क्षिरसागर उपस्थित होते.
   आ.पाचपुते यांनी सांगितले की श्रीगोंदा तालुक्यासाठी श्रीगोंदा शहरांमध्ये पूर्ववत कोविड सेंटर सुरू केले जावे. कोविड चाचण्यांची व्यवस्था केली जावी. मास्कचे आणि शारीरिक आंतर पाळण्याचे बंधन कडक करण्यात यावे. गर्दीवर नियंत्रण आणावे. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी तालुक्यातील कोविड रुग्णाची सद्यस्थिती आढावा बैठकीत दिली. तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले की दि. 28 मार्च ते दि.15 एप्रिल अखेर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 अन्वये जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई राहील. रात्री 8 ते सकाळी 7 दरम्यान पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्यास प्रती व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळून इतर कामासाठी इतर व्यक्तीच्या हालचाली वर /फिरण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 या कालावधीत निर्बंध राहतील.विना मास्क आढळलेल्या व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात येईल.सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळलेल्या प्रती व्यक्तीस एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. विवाह समारंभात जास्तीत जास्त 50 व्यक्तींची उपस्थिती मान्य राहिल.विवाह समारंभात दोन व्यक्ती मध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर आवश्यक राहील. अंत्यसंस्कार /अंत्यविधी यास जास्तीत जास्त 20 व्यक्तींना परवानगी राहील.अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा दिनांक 30 मार्च 2021 पासून दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशित केले आहे.
   तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन खामकर यांनी सांगितले की, श्रीगोंदा तालुक्यात गावोगाव कोविडचा संसर्ग वाढत असून, आता तालुक्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू करणे फार आवश्यक आहे. गावोगावच्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला सहकार्य केले तर आपण कोरोनाचा प्रतिबंध करू शकतो. ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील अशा लोकांनी चार आठवड्याच्या अंतराने लस घ्यावी दि. 1 एप्रिल 2021 पासून 45 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला कोरूनाची लस घेता येईल असे सांगितले.

No comments:

Post a Comment