आपुलकीच्या दोन शब्दांनीही जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो ः रेखी
कुष्ठधाम येथे वाचनालयाच्यावतीने फळे वाटप
नगरी दवंडी/प्रतिनिधीअहमदनगर ः आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना प्रत्येकाने आपल्या मनात ठेवली पाहिजे. समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांसाठी आपण काम केले पाहिजे. आपणही समाजापेक्षा वेगळे नसून आपण समाजाचे घटक आहोत ही भावना निर्माण झाली पाहिजे. आपुलकीच्या दोन शब्दांनीही त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होऊ शकतो. स्व.अनिल राठोड यांनीही उपेक्षित, सर्वसामान्यांसाठी कार्य केले, त्यांचे कार्य आपणही कृतीतून पुढे सुरु ठेवले पाहिजे. जिल्हा वाचनालयाचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी मोलाची भुमिका बजावली, असे प्रतिपादन वाचनालयाचे उपाध्यक्ष अजित रेखी यांनी केले.
स्व.अनिलभैय्या राठोड यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने कुष्ठधाम येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्ष अजित रेखी, सहकार्यवाह डॉ.राजा ठाकूर, प्रा.ज्योती कुलकर्णी, ग्रंथपाल अमोल इथापे, सहा.ग्रंथपाल नितीन भारताल आदि उपस्थित होते.
याप्रसंगी राजा ठाकूर म्हणाले, जिल्हा वाचनालयाच्यावतीने वाचन संस्कृती वाढावी, यासाठी स्पर्धा, व्याख्याने असे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचबरोबर सामाजिक दायित्व म्हणून समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देत असतो.
ग्रंथपाल अमोल इथापे यांनी वाचनालयाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.प्रा. ज्योती कुलकर्णी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment