महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठिय्या आंदोलन आश्वासनानंतर स्थगित
कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन- वसिम राजे
नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः स्टेट बँकेच्या अधिकारी, कर्मचार्यांकडून ग्राहकांना सौजन्याची वागणूक मिळावी, नियमानुसार सकाळी 10 ते दुपारी 4 या कालावधीत सलग कामकाज सुरू ठेवावे,कामकाजाच्या वेळेचा फलक ग्राहकांना स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने बँकेच्या दर्शनी भागात लावावा,ग्राहक सेवा केंद्रात व्यवहार करण्याची सक्ती ग्राहकांना करण्यात येऊ नये या इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील स्टेट बँकेच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले.आंदोलकांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बँकेच्या कामकाजातील त्रुटी दूर करण्याचे लेखी आश्वासन शाखा व्यवस्थापक श्रीराज शेवाळे यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.दरम्यान बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे शहराध्यक्ष वसिम राजे यांनी दिला आहे.
आंदोलनात मनसेच्या राज्य सहकार सेनेचे उपाध्यक्ष डी. एन. साबळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी,सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के,शहराध्यक्ष वसिम राजे,जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहोकले,तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे,अविनाश पवार,अक्षय सुर्यवंशी,निखिल बोरकर,अविनाश औटी,बंडू बनकर,मिलिंद काळे,सनी थोरात आदी सहभागी झाले होते.
आंदोलकांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्यांसंदर्भात शाखा व्यवस्थापक शेवाळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बँकेच्या अधिकृत सेवा केंद्रात कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.ते केंद्र बँकेच्या कामकाजाच्या वेळेच्या व्यतिरिक्त इतर वेळेत ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी आहे.या केंद्रात व्यवहार करण्याची सक्ती करण्यात येणार नाही.तांत्रीक बिघाडामुळे एटीएम,सीडीएम,खातेपुस्तक छपाई मशिन बंद पडले तर संबंधित अभियंत्याने दुरुस्त केल्यानंतर ते सुरू होते.त्यामुळे काही काळ गैरसोय होऊ शकते.यांत्रीक सोयी़ंची उपलब्धता किमान 85 टक्के असावी यासाठी प्रयत्न केले जातात.बँकेच्या तसेच ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचार्यांनी ग्राहकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे पत्रात म्हटले आहे.
जेवणाच्या सुट्टीत कामकाज सुरू राहील याची काळजी घेतली जाईल.वेगवेगळ्या वेळी कर्मचारी जेवणाची सुटी घेतील.येत्या दोन दिवसांत कामकाजाच्या वेळेचा फलक बँकेच्या दर्शनी भागात लावण्यात येईल व या वेळेनुसार ग्राहकांना सेवा देण्यात येईल असे शाखा व्यवस्थापक शेवाळे यांनी आंदोलकांशी चर्चा करताना स्पष्ट केले.लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
कर्मचार्यांच्या अरेरावीचा अनुभव ग्राहकांना नेहमीच येतो. तांत्रिक बिघाड,सर्व्हर बंद पडणे आदी सबबींखाली अनेकदा ग्राहकपयोगी सेवा बंद असतात.अपवादात्मक परिस्थितीत तांत्रिक बिघाड होऊ शकतात.पण तांत्रिक बिघाड ही काही वारंवार घडणारी घटना नाही.बिघाड होऊ नयेत यासाठी व्यवस्थापनाने काळजी घेणे आवश्यक आहे. बँकेच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. - वसिम राजे, शहराध्यक्ष मनसे.
No comments:
Post a Comment