बोल्हेगाव, नागापुर परिसर चोरी रोडरोमियो मुळे त्रस्त !
नगरसेवक कुमार वाकळेंचे तोफखाना पोलिसांना निवेदन. पोलीस चौकी व गस्त वाढविण्याची गरज..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोल्हेगाव परिसरातील मोठ्या प्रमाणात चोऱयांचे प्रमाण वाढले आहे. घराच्या कंपाऊंडमधून दुचाकी गाड्यांची चोरी करत आहेत. तसेच बंद घरांचे कुलूप तोडून मोठ्या प्रमाणात ऐवज लंपास करत आहेत. यासाठी पोलिसांची गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा. बोल्हेगावमधील गणेश चौक, आंबेडकर चौक, भारत बेकरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे या भागातील नागरिकांना रोडिरोमिओंचा त्रासही सहन करावा लागत आहे, यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, तसेच बोल्हेगाव, नागापुर परिसरात पोलिस गस्त वाढवावी तसेच या भागातील गुन्हेगारांवर वचक बसवा यासाठी पोलीसचौकी उभारण्यात यावी अशी मागणी प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी निवेदनाद्वारे तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याकडे केली.
श्री वाकळे यांनी गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोल्हेगाव परिसरामध्ये दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणात लोकवस्तीत वाढ होत आहे. जवळच औद्योगिक वसाहत असल्यामुळे कामगार वर्गही मोठ्या प्रमाणात वास्तव्य करत आहेत. या ठिकाणी परप्रांतिय व अनोळखी व्यक्ती तसेच समाज कंटकाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालली आहे. रोडरोमिओंकडून महिला व युवतींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. महिलांना कामानिमित्त घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. चोरांवर व रोडरोमिओंवर वचक बसण्यासाठी बोल्हेगाव परिसरामध्ये पोलिस चौकी सुरू करून गस्त वाढवावी,
गेल्या महिनाभरापासून चोरांनी शहर परिसरामध्ये धुमाकूळ घातला असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना चोरांपासून सुटका मिळावी, यासाठी पोलिसांनी चोरांचा बंदोबस्त करावा. यासाठी गस्त वाढविण्याची आवश्यकता आहे. नागरिक घरात असतानाही भरदिवसा चोर्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यावरुन असे दिसून येते की, पोलिसांची चोरांना भीती नसल्यासारखेच ते वावरत आहेत. यासाठी पोलिसांनी कणखर भूमिका घेऊन चोरांचा बंदोबस्त करावा.
यावेळी नवनाथ वाकळे, वैभव दळवी, अनिल म्हसे, संजय साळुंके, रघुनाथ लहारे, वैजनाथ पवार, भाऊसाहेब इथापे, संदीप म्हस्के, निलेश साळुंके, रिहान सय्यद, बाबुराव जाधव आदी नागरिक उपस्थित होते. यावेळी सुनील गायकवाड यांनी शिष्टमंडळास सांगितले की, लवकरच बोल्हेगाव परिसरामध्ये कायमस्वरुपी चौकी सुरु करून पोलिस राहतील. या भागामध्ये ठिकठिकाणी पोलिस गस्त वाढविली जाईल. याचबरोबर नाकाबंदी करून तपासणी सुरू केली जाईल. नागरिकांना पोलिसांचे सहकार्य राहिलच. याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून कायद्याच धाक निर्माण करु, असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment