‘स्थायी’ लढविण्याचा शिवसेनेचा निर्धार!
विजय पठारे यांचा अर्ज दाखल..
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील महा विकास आघाडी व नगर मनपातील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला या निवडणुकीत वेगळे पाडल्याबद्दल शिवसेनेने नगर मनपा स्थायी समितीची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप झाला नाही, तर ही निवडणूक शिवसेना लढविणार असल्याचे स्पष्ट झाले. नगरसेवक विजय पठारे यांनी आज दुपारी शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत.
पठारे यांच्या एका अर्जावर सूचक रीता भाकरे व अनुमोदक सचिन शिंदे तर दुसर्या अर्जावर सूचक रिता भाकरे व अनुमोदक परसराम गायकवाड यांच्या सह्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश घुले यांनी काल महापौर बाबासाहेब वाकळे यांचे समवेत स्थायी समिती सभापतीपदासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले.राज्यात शिवसेना- राष्ट्रवादी -काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर असताना व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान असताना शहरातील राजकारणात शिवसेनेला दुय्यम स्थान दिले जात असल्याबद्दल शिवसेना नेते व शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे.राज्यस्तरीय शिवसेना नेते याबाबत लक्ष घालत नसतील, तर जिल्ह्यात शिवसेना कधी वाढणार हा प्रश्न शिवसैनिकांमध्ये चर्चिला जात आहे.
स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचा स्वर्गवास झाल्यानंतर शिवसेनेमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.नगर शहरात हिंदुत्वाची मोठी वोट बॅक असताना शिवसेनेने राज्यात भाजपाशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांची मोठी गोची झाली आहे. राज्यात सत्ता असून शिवसैनिक नाराज आहेत. ज्यांना विरोध करून शिवसेना वाढविली त्यांचेबरोबर कसे जुळवुन घ्यावे व जुळवून घेत तरी सत्तास्थाने प्राप्त होत नसतील मग राज्यातील महाविकास आघाडीच्या शासनाचा शिवसैनिकांना काय उपयोग याचा विचार शिवसेनेला करावा लागणार आहे.
स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक शिवसेना लढविणार आहे. शिवसेनेच्या राज्यस्तरीय नेत्यांना याची कल्पना दिली आहे. वरिष्ठांनी निवडणुका लढवू नका असे सांगितले तर शिवसेना या निवडणुकीत अर्ज माघारी घेईल. अन्यथा जय-पराजय याचा विचार न करता निवडणूक लढविणार आहे.
- दिलीप सातपुते, नगर शहर शिवसेनाप्रमुख
No comments:
Post a Comment