सामाजिक कार्यकर्ते रामराव भदगले यांच्या पाठपुराव्याला अखेर यश
गोदावरी खोरे लाभक्षेत्रातील नागरिकांना होणार फायदा.नगरी दवंडी/ज्ञानेश सिन्नरकर
नेवासा ः भारतीय जनसंसदचे नेवासा तालुका अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रामराव भदगले यांच्या अथक पाठपुराव्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खो-यात वळविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडून घेण्यात आला आहे.
भारतीय जनसंसदचे नेवासा तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रामराव भदगले यांनी सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाचे समुद्राला वाहून जाणारे पाणी अडवून बोगद्याद्वारे पश्चिम वाहीनी नद्यांमधून दुष्काळी भागात सोडून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करावा या मागणीचे पत्र दिनांक 18 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना पाठविले होते. याच मागणीसाठी रामराव भदगले यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत 28 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई येथे विधानभवनावर आंदोलन करून तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून लिखित आश्वासन मिळविले होते. याच पत्राची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालय व महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतली आहे. यासंदर्भात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्री.दि.येवले यांनी दि. 2 फेब्रुवारी 2021 रोजी रामराव भदगले यांना तसे पत्र दिले आहे. या पत्रातील उल्लेखाप्रमाणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडील गोदावरी खो-यात वळविण्यासाठी एकूण 30 प्रवाही वळण योजना व 2 राज्यांतर्गत नदीजोड योजना प्रस्तावित असून सदर योजनेद्वारे 19.58 अब्ज घनफूट पाणी गोदावरी खोर्यात वळविले जाणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.
No comments:
Post a Comment