शिवजयंतीस रेल्वे क्रांती आंदोलनाची मशाल प्रज्ज्वलीत करणार
रेल्वेचा कारभार अनागोंदी व नोकरशाही टंगळमंगळ असल्याचा आरोपनगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने शुक्रवार दि.19 फेब्रुवारी शिवजयंती दिनी ऐतिहासिक लोखंडी पुलावर रेल्वे क्रांती आंदोलनाची मशाल प्रज्वलीत करण्यात येणार आहे. तर रेल्वेमंत्री पियुष गोयल व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची तुला करुन, गडकरी यांच्या कार्याला सलाम करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
ब्रिटीशांच्या काळात भारतातील रेल्वेचे जाळे पसरले. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात इतर देशांच्या तुलनेत भारतात रेल्वे जाळे पसरु शकलेले नाही. अहमदनगरकरांच्या वतीने जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पुणे-नगर-शिर्डी शटल रेल्वेसेवा अद्यापि सुरु होऊ शकलेली नाही. रेल्वेचा कारभार अनागोंदी असून, नोकरशाही टंगळमंगळ असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी तीन मजली उड्डणपुलाची घोषणा करुन 6 हजार कोटीचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ही विकासात्मक दृष्ट्या आवश्यक बाब आहे. गडकरी यांनी पुढाकार घेऊन अनेक महामार्ग व उड्डणपुलांचे काम मार्गी लावले आहे. घोषणा केलेले सदर काम देखील मार्गी लागणार आहे. मात्र रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचे कार्य कासव गतीने सुरु असून, रेल्वे विभाग अकार्यक्षमतेमुळे दिवाळखोरीच्या वाटेवर आहे. तर त्याचे खाजगीकरण करण्याच्या तयारीत देखील सरकार आहे. काम करण्याची उर्मी व आकांक्षा नसल्याने रेल्वेचे प्रलंबीत प्रकल्प पुर्ण होताना दिसत नसल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या रेल्वे क्रांती आंदोलनासाठी हरजितसिंह वधवा, अर्शद शेख, अॅड. कारभारी गवळी, सुहास मुळे, जालिंदर बोरुडे, संजय सपकाळ, अशोक सब्बन, रमेश बाफना, धनेश बोगावत, ए.बी. बोरा, दत्तात्रय गायकवाड, अन्वर सय्यद, हुसेन सय्यद, जयकुमार मुनोत, राजेंद्र पडोळे, कैलास दळवी, बहिरुनाथ खंडागळे, जयराम मल्लिकार्जुन, सुवालाल ललवाणी आदी प्रयत्नशील आहेत.
No comments:
Post a Comment