वसंतराव मुंडे यांना ’सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांना ग्रामीण विकास केंद्र संचालित निवारा बालगृह आयोजित निवारा महोत्सवात ’निवारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ सन्मानपूर्वक प्रदान करून सन्मानित करण्यात आला.
ग्रामीण विकास केंद्राचे जेष्ठ विश्वस्त प्रा. डॉ. बाळासाहेब बळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जामखेड चे तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ड. डॉ. अरुण जाधव, सचिव उमाताई जाधव, अध्यक्ष अलकाताई जाधव, लावणी सम्राज्ञी संजीवनी मुळे नगरकर, ऊस तोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवराज बांगर, ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापु ओहोळ, शब्दगंध चे संस्थापक सुनिल गोसावी, प्रसिद्धी प्रमुख भगवान राऊत आदी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी, वसंतराव मुंडे यांनी आपल्या वाढदिवसाचा कुठलाही बडेजाव न करता महाराष्ट्र राज्य पत्रकार संघामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून सुमारे 1000 रक्तपिशव्यांचे संकलन केले. तसेच अनाथ, गरीब, गरजूंना मोफत ब्लँकेट वाटप केले. कोरोना व लॉक डाऊनच्या काळात वसंतराव मुंडे यांनी अनेकांना मदत केली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
वसंतराव मुंडे यांना मिळालेल्या निवारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कारामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे, प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे, राज्य माध्यम समन्वयक भगवान राऊत, मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment