मुळा धरणातून रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून आवर्तन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः मुळा धरणातून सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला . रब्बीसाठी एक तर उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांवर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
पालकमंत्री हसन मूूूश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कालवा सल्लागार समितीची बैठक नगरला झाली . जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी , अधीक्षक अभियंता अलका अहिरराव , मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील , आमदार मोनिका राजळे , माजी आमदार पांडुरंग अभंग व कालवा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते . जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अन्य बैठकीत व्यस्त असल्याने त्यांना जलसंपदा अधिकार्यांनी बैठकीतील आवर्तनाच्या नियोजनाची माहिती दिली .
मुळा धरणात पिण्याचे व औद्योगिक वापराचे आरक्षित पाणी , तसेच बाष्पीभवन व (डेड स्टोक ) मृत साठा वगळता 14 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे . धरणाच्या उजव्या - डाव्या कालव्यांद्वारे रब्बीत एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांचे नियोजन जलसंपदा विभागाने केलेआहे .
उजव्या कालव्याचे प्रत्येक आवर्तन 40 दिवस चालेल . राहुरी , नेवासे , पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 30 हजार हेक्टरचे सिंचन होईल . उजव्या कालव्यातून रब्बीसाठी चार हजार दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी 9 हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल . डाव्या कालव्याचे आवर्तन 20 ते 25 दिवसांचे असेल . राहुरी तालुक्यातील तीन हजार हेक्टरचे सिंचन होईल . डाव्या कालव्यातून रब्बीसाठी 500 दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल . संभाव्य तारखा या रब्बी हंगामासाठी 15 जानेवारी ते 24 फेब्रुवारी तर उन्हाळी हंगामासाठी 10 मार्च ते 19 एप्रिल 10 मे ते 18 जून अशा रहाण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment