वडारवाडी मधील गरजू महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरात विविध भागात काच, कागद, कचरा व भंगार गोळा करून उदरनिर्वाह करणार्या दुर्लक्षित महिला वर्षानुवर्ष उपेक्षित जीवन जगत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी स्पर्श सेवाभावी संस्था व सामाजिक समता विचारधारा फाउंडेशने पुढाकार घेतला असून शहरात विविध भागातील गरजू महिलांना मदत करत आहेत. स्पंदन उपक्रमांतर्गत आर्थिक परिस्थिती बेताची असणार्या वडारवाडी मधील वीस लाभार्थी महिलांची निवड करण्यात आली असून त्यांना शिवणकाम, विणकाम, लोणचे पापड तयार करणे, मसाले बनवणे, ब्युटी पार्लर, मेहंदी इत्यादी व्यवसायांच्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला सुद्धा बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. कागद कचरा गोळा करणार्या 20 गरजू महिलांना करोना पासून बचावासाठी देण्यात आलेल्या सेफ्टी किट मध्ये सॅनिटरी पॅड, हॅण्ड ग्लोज, गमबुट, हॅण्ड वॉश, मास्क, कपड्याचा व अंगाचा साबण इत्यादी महत्वाच्या वस्तू देण्यात आल्या. अशी माहिती स्पर्श संस्थेचे सचिव प्रवीण साळवे यांनी दिली.
भिंगार येथील वडारवाडी येथे राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये सामाजिक समता विचारधारा फाउंडेशन चे अध्यक्ष सुनिल भोसले, सौ. मीना भोसले, संजय ससाणे, पै. गणेश घोरपडे आदी सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी संजीवनी मेडिकल स्टोअर वडारवाडी, ड. जयदीप देशपांडे व अतुल महानौर, राजेंद्र सामल यांनी सहकार्य केले. स्पर्श सेवाभावी संस्था, वडारवाडी व सामाजिक समता विचारधारा फाउंडेशन यांच्या वतीने आर्थिक परिस्थिती बेताची असणार्या महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांना दानशुरांच्या मदतीची गरज आहे. दानशुरांनी सेफ्टी किटसाठी व व्यावसायिक प्रशिक्षणासाठी लागणार्या आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी संस्थेस मदत करावी. अधिक माहितीसाठी 9075512802, 7385084545 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन स्पर्श सेवाभावी संस्थेचे सचिव प्रवीण साळवे व सामाजिक समता विचारधारा फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील भोसले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment