दिव्यांगाला नवीन घर हीच मला वाढदिवसाची भेट - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 6, 2020

दिव्यांगाला नवीन घर हीच मला वाढदिवसाची भेट

दिव्यांगाला नवीन घर हीच मला वाढदिवसाची भेट
राज्यमंत्री बच्चू कडू यांची स्पष्टोक्ती; प्रहारने दिव्यांगासाठी बांधले घर



नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून अहमदनगर प्रहार संघटनेने असलम पठाण या अंध असलेल्या आणि अत्यंत हलाखीचे जीवन जगणार्या दिव्यांग व्यक्तीला नवीन घर बांधून दिले. या दिव्यांगाच्या चेहर्यावरचा आनंद आणि त्यांच्या कुटुंबीयांचे समाधान हेच मला वाढदिवसाची अनोखी भेट आहे. अशा भावना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार मंजिल या घराच्या अनावरण प्रसंगी फोनवरून व्यक्त केली.
असलम पठाण हे दिव्यांग व्यक्ती आपल्या कुटुंबासह कोठला येथे पडक्या घरात हलाखीच्या परिस्थितीमध्ये राहत होते. त्यांना अहमदनगर प्रहार संघटनेच्या वतीने घर बांधून देण्यात आले. तर या घराची चावी राज्यमंत्री बच्चू कडू  यांच्या वाढदिवशी पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी प्रहार राज्य वारकरी संघटनेचे अजय महाराज बारस्कर, प्रहार शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, माजी सभापती अशोक झरेकर, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, प्रहार अपंगाचे अध्यक्ष सल्लागार डॉ. दादासाहेब काकडे, अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे, अपंग महिला जिल्हाध्यक्ष लक्ष्मीताई, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू येवले, जिल्हा कार्याध्यक्ष अजित धस, जिल्हा सचिव प्रकाश बेरड, विद्यार्थी अध्यक्ष योगेश्वर घागरे, आनंद दातरंगे, युवक तालुकाध्यक्ष सागर जाधव, शंकर मामा पवार, शिरसाठ मेजर, संभाजी भगत, नंदू वारुळे, विलास कोरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, खरंतर अशा कार्यक्रमाला मी जातीने उपस्थित राहत असतो. परंतु कोरोनारोगामुळे मला प्रत्यक्ष उपस्थिती शक्य नाही. परंतु जिथे जिथे परोपकार आणि अपंगांचे अश्रू पुसण्याचे काम केले जाते त्या ठिकाणी मी अंतकरणापासून हजर असतो. प्रहार संघटना तुकाराम महाराजांच्या जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले! या वचनाप्रमाणे काम करणारी संघटना आहे. जात, पात, धर्म, पंथ न पाहता मानवता हाच दृष्टिकोन ठेवून असलम पठाण या अपंगांच्या अंतकरणात पांडुरंग समजून काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे असलम पठाण यांना नवीन घर हीच आमची पंढरपूरची वारी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तर या उपक्रमासाठी विशेष कष्ट घेणारे बारस्कर महाराज, संतोष पवार, विनोदसिंग परदेशी, अ‍ॅड.लक्ष्मणराव पोकळे, अजित धस, प्रकाश बेरड यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.


No comments:

Post a Comment