धक्कादायक! उसने दिलेले पैसे परत मागितल्याने हत्या.
खर्डी शहापूर तालुक्यातील शिवनेर गावाजवळ शेतात एक अनोळखी मृतदेह ११ जून रोजी आढळला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे; तर एक आरोपी फरारी आहे. मित्राने उसने दिलेले १६ लाख रुपये मागितल्यामुळे आरोपींनी हत्या केली असल्याचे तपासात उघड झाले आहे.
कल्याण (चक्की नाका) येथील गोपाळ रंग्या नायडू (वय ६२) हे बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यामुळे गुन्हे शाखेने पथके बनवून तपास सुरू केला होता.
मृतदेहाची ओळख पटवून घेतली व गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन तांत्रिक तपास सुरू केला. अरुण जगन्नाथ फर्डे (वय ३२, रा. धसई, फर्डेची) व सोमनाथ रामदास जाधव (वय ३५, कल्याण, खडकपाडा) यांना सापळा रचून ताब्यात घेतले.
या दोघांकडे तपास केले असता फरार आरोपीने मृत गोपाळ नायडू यांच्याकडून १६ लाख रुपये उसने घेतले होते. ते पैसे गोपाळ वारंवार फरार आरोपीकडे मागत होता. त्यामुळे गोपाळचा राग मनात ठेवून तिघांनी मिळून गोपाळची हत्या केली असल्याची कबुली अरुण व सोमनाथ यांनी दिली असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment