कुसुम योजनेतील सौर ऊर्जेच्या पंपाच्या अर्जासाठी शेतकऱ्यांची दमछाक.
श्रीगोंदा - पीएम कुसुम योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप मिळण्यासाठीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र संकेतस्थळावर अर्ज करताना शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच अडचणी येत आहेत.
वारंवार प्रयत्न करूनही संकेतस्थळ सुरू होईना आणि जेव्हा सुरू झाले तोपर्यंत संबंधित जिल्ह्यातील कोटा संपला, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रयत्न करूनही हजारो शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या (महाऊर्जा) वतीने राज्यात महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम घटक ब योजनेचा पुढील टप्पा राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सौर कृषिपंपांसाठी खुल्या गटाला ९०, तर अनुसूचित जमातीसाठी ९५ टक्के अनुदान देण्यात येते.दि
जिल्हानिहाय कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा कोटा पूर्ण झाल्यानंतर पोर्टल बंद करण्यात येणार आहे. शेतीपंपांचे सौर ऊर्जाकरण करण्यासाठी केंद्र सरकारने पीएम कुसुम योजना आणली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख १८ हजार ८९७ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ७० हजार ५२९ शेतकऱ्यांनी स्वहिश्शाची रक्कम भरली. तर ६९ हजार ६६९ जणांनी सौर पंप पुरवठादारांची निवड केली आहे. त्यामुळे हे पंप बसविले जातील.
खुल्या गटासाठी तीन एचपी पंपासाठी १९ हजार ३८०, पाच एचपीसाठी २६ हजार ९७५, तर साडेसात एचपीसाठी ३७ हजार ४४० रुपये स्वहिश्शाची रक्कम भरावी लागेल. तसेच अनुसूचित जाती आणि जमातींसाठी तीन एचपीसाठी ९ हजार ६९०, पाच एचपीसाठी १३ हजार ४८८, साडेसात एचपीसाठी १८ हजार ७२० रुपये भरावे लागतील.
प्रथम लाभ घेतलेल्यांना संधी नाही या योजनेचा लाभ दोन वेळा घेता येणार नाही. त्यामुळे यापूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी आता ऑनलाइन अर्ज भरू नयेत, असे आवाहन महाऊर्जाने केले आहे. अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.
तर गुन्हा दाखल होणार पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषिपंपाचा लाभ घेतलेले शेतकरी सौर कृषिपंप काढून ठेवतात आणि लाभ घेतला नसल्याचे भासवून दुसरा सौर कृषिपंप महाकृषि ऊर्जा अभियानांतर्गत बसवून घेतात. अशा प्रकारे कुणी पंप बसवून घेतल्यास त्याचा सौर कृषिपंप काढून घेण्यात येईल. त्याने भरलेली लाभार्थी हिश्शाची रक्कम जप्त केली जाईल, असेही महाऊर्जाने कळविले आहे. या शेतकऱ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात येईल.
अनेक गावे वंचित अनेक गावांतील शेतकरी ऑनलाइन अर्ज सादर करताना अडचणी येत आहेत. भूजल सर्वेक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुरक्षित गावांच्या यादीतील गावांमध्येच कुसुम योजनेअंतर्गत पंप मंजूर करण्यात येत आहेत.
अनेक गावांची नावे सुरक्षित गावांच्या यादीत नसल्याने या गावांतील सौर ऊर्जा पंप घेण्यास पात्र होत नाहीत. मात्र हे शेतकरी डिझेल पंप वापरत असतील, तर त्यांना सौरपंप बसवून देण्यात येतील, असे अर्ज भरताना सांगितले जात आहे.
No comments:
Post a Comment