नगर जिल्ह्यात 2 दिवसांत 6 बालविवाह रोखले.
अहमदनगर - ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात लपून-छपून बालविवाह उरकण्याचे प्रकार सुरू आहेत. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही, अनेक पालक तिचे हात पिवळे करण्याचा प्रयत्न करतात. प्रशासनाकडून जनजागृती केली जाते, असे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात, अनेकदा जेलची हवा खावी लागते, तरीही हे प्रकार थांबताना दिसत नाहीत. गेल्या दोन दिवसांत असे सहा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
‘चाईल्ड लाईन’ या सेवाभावी संस्थेच्या १०९८ या मोफत क्रमांकावर मिळालेल्या माहितीनुसार तात्काळ पावले उचलण्यात आल्याने हे बालविवाह रोखण्यात यश आले. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, जामखेड, पारनेर, राहुरी, नेवासे व अहमदनगर शहर येथील अल्पवयीन मुलींचे बालविवाह होत होते. प्रशासनाने हे सर्व विवाह वेळीच माहिती मिळाल्याने रोखले. चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक महेश सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशक अलिम पठाण व टीम मेंबर राहुल कांबळे यांनी ताबडतोब या घटनांची माहिती घेतली. नंतर अहमदनगर बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, पोलिस स्टेशन, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांना बालविवाह रोखण्यासंबंधित पत्रव्यवहार करण्यात आले. माहिती मिळालेल्या ठिकाणचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्याकडून घटनास्थळी पोहोचून कारवाई करण्यात आली. त्यामुळे संभाव्य बालविवाह रोखण्यात यश आले. संबंधित मुलगा-मुलीच्या पालकांना जिल्हा बालकल्याण समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोठेही बालविवाह होत असल्यास, प्रशासन व चाईल्ड लाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment