चार दिवसांपूर्वी विष घेऊन इर्विनमध्ये पोहोचलेल्या दाम्पत्यापैकी पत्नीचा त्याच दिवशी मृत्यू झाला होता. तर पतीवर अजूनही उपचार सुरू आहेत. दरम्यान सहा महिन्यांपूर्वीच या दाम्पत्याने प्रेमविवाह केला असल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले आहे. हेमलता प्रणय धुर्माळे (२४) असे मृत महिलेचे तर प्रणय साहेबराव धुर्माळे (२६, दोघेही रा. चिखलसावंगी) असे विष घेतल्यामुळे अत्यवस्थ असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
गुरुवारी (दि. १२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हेमलता आणि प्रणय दोघेही इर्विनमध्ये पोहोचले होते. त्यावेळी प्रणयची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यावेळी हेमलता यांनी पती प्रणयला दाखल केले व स्वत: बाहेर निघून गेली. काही वेळानंतर हेमलता अत्यवस्थ स्थितीत रुग्णालय परिसरातच आढळली होती. उपचारादरम्यान गुरुवारी सायंकाळीच त्यांचा झाला होता. हेमलता आणि प्रणय यांची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम झाले व त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. त्यांनी परस्परच विवाह केला होता.
लग्नानंतर काही दिवस ते घरीसुद्धा गेले नव्हते मात्र दिवाळीच्या काळात ते प्रणयच्या घरी चिखलसावंगीला गेले होते. पण चिखल सावंगी वरुन पुन्हा दोघेही अमरावतीत राहायला आले. मात्र अमरावतीत कुठे राहायचे, प्रणय काय काम करतो, याबाबत मात्र त्याच्या कुटुंबीयांना अजूनही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, १२ जानेवारीला सायंकाळी या दोघांनी कीटकनाशक आणले व रेल्वे स्टेशन चौकात प्राशन केले. त्यानंतर त्यांनी स्वत:च गंभीर स्थितीत ऑटोने इर्विन गाठले होते. दरम्यान कोतवाली पोलिसांनी प्रणयला याबाबत विचारपूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र आर्थिक चणचण होती, काम मिळत नव्हते, असे सांगतो आहे, मात्र त्याचा सविस्तर जबाब उपचार सुरू असल्यामुळे झाला नसल्याचे कोतवाली पोलिसांनी सांगितले.
No comments:
Post a Comment