महाराष्ट्र फेब्रुवारीअखेर शंभर टक्के अनलॉक होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्र्यांनी घेतले करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन.
कोल्हापूर - कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला होता. यातच ओमायक्रॉनचा शिरकाव झाला. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची दर्शन घेतलं आहे. राज्यावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे अशी प्रार्थनाही त्यांनी आई अंबाबाई चरणी केलीय. आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने राजेश टोपे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. मुंबईसह आता राज्यातील निर्बंधाबाबतची माहिती यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. फेब्रुवारीअखेर नाट्यगृह, चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या घटत चालल्यानं नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्स फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याकडे कल राहिल, अशी माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील निर्बंध पूर्णपणे हटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल.
आज सकाळी कोल्हापुरात दाखल झाले. त्यानंतर काही काळ शासकीय विश्रामगृहावर ते थांबले. त्यानंतर मंत्री राजेश टोपे यांनी थेट करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवी चरणी लीन होऊन यांनी प्रार्थनाही करत आरतीचा लाभ ही घेतला आहे. देवस्थान समितीच्या वतीने राजेश टोपे यांचा सत्कारही करण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच पालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहं, नाटयगृहं, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे. यासोबतच लग्नसमारंभासाठी 200 जणांच्या उपस्थितला परवानगी आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळं निर्बंध आणखी शिथिल करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
No comments:
Post a Comment