राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत निर्णय. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको.
कोरोनामुळे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द.
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्यायच्या नाहीत असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहेतसेच ओबीसी आरक्षणाबाबतची न्यायालयीन प्रकरणाची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी माहिती दिली.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्या निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे यावर चर्चा झाली. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील असेही बैठकीत ठरले. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देण्यात आल्याचेही बैठकीत ठरल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
या बैठकीत राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवरही चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबीर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नये असा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. मात्र मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील, असंही ठरल्याचं त्यांनी सांगितलं. पक्षातंर्गत होणार्या निवडणूकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय ज्या आगामी निवडणूका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे. तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडी करण्यासाठी स्थानिक पातळीवरच निर्णय घ्यावेत असंही या बैठकीत ठरल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
No comments:
Post a Comment