दहा लाखाची बॅग पळविणार्या आरोपींना त्वरित पकडावे
कर्जत व्यापारी असोसिएशनचे निवेदन
नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः येथील आडत व्यापारी रवींद्र कोठारी यांचे मुलांकडून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दहा लाख रुपयांची बॅग पळवून नेणार्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीचे निवेदन कर्जत व्यापारी असोसिएशनचे वतीने उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना देण्यात आले.
सोमवार दि 4 ऑक्टो रोजी कर्जत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून आडत व्यापारी रवींद्र कोठारी यांचा मुलगा पियुष कोठारी याने शेतकर्याना पैसे देण्यासाठी बँकेतून दहा लाख रुपये काढून आणले होते, हे पैसे असलेली बॅग हिसकावून त्याच्याच आडतीवर काम करणारे सोमनाथ विठ्ठल साळुंके व प्रमोद विजय आतार या दोघांनी पोबारा केला होता. याबाबत दि 4 ऑक्टो रोजीच कर्जत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला गेला. सदर आरोपी कोरेगाव तालुका कर्जत येथील असून ही अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही अशा प्रकारच्या घटना कर्जत तालुक्यात घडत असतील तर ते व्यापार्यांच्या व नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत घातक असून यामुळे व्यापारी भयभीत झाले आहे तरी सदर गुन्ह्याचा तपास लावून आरोपींना तात्काळ अटक करत आरोपींवर चाप बसवावा अशी मागणी कर्जत व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवेदन देऊन उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्याकडे करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास जलद गतीने करण्याबाबत व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत सूचना द्याव्यात असेही या निवेदनात म्हटले आहे, व्यापारी असो. चे अध्यक्ष अर्जुन भोज, रवींद्र कोठारी, सराफ असो. चे अध्यक्ष दीपक शहाणे, प्रसाद शहा, बिभीषण खोसे, संजय काकडे, महावीर बोरा, गोविंद भणगे, सचिन कुलथे, ऍड अशोक कोठारी, अभय बोरा, संतोष भंडारी, प्रफुल्ल नेवसे, अतुल कुलथे, विशाल छाजेड, दीपक शहा, आदींसह अनेक व्यापारी सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment