लोकमान्य टिळकांनी सण, उत्सवाच्या माध्यमातून एकतेची भावना निर्माण केली- महापौर शेंडगे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गांधीवादी विचारांच्या विरुद्ध लोकमान्य टिळक हे उग्रवादी विचारांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे नेते होते. त्यांनी देशवासीयांना एकजूट होऊन संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. त्यांनी आपल्या संघर्षाने एका नवीन युगाची सुरुवात केली. महाराष्ट्रात शिवजयंती व गणपती उत्सव सुरू केले. या सणांना सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे हा होता. टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. शेवटच्या श्वासापर्यंत ते देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी लढत राहिले. त्यांचे हे कार्य आपणास नेहमीच प्रेरणादायी राहिल, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळकरोड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिवसेनेच्यावतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, दिपक खैरे, संतोष गेनप्पा आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, लोकमान्य टिळक आणि नगरचे नाते दृढ आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी ‘स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच’ ही ऐतिहासिक घोषणा नगरमध्ये केली ही नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. त्यांचे कार्य युवा पिढीने आत्मसात करुन त्याप्रमाणे कार्य केले पाहिजे. असे सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी भगवान फुलसौंदर, संभाजी कदम यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनाचरित्रावर प्रकाश टाकून त्यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले.
No comments:
Post a Comment