आंदोलनाशिवाय सरकारला जाग येत नाही- महेश तवले
भाजप युवा मोर्चा व अभाविपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने...
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः एम.पी.एस.सी.च्या मुख्य परिक्षेनंतरील भरती प्रक्रिया जलदगतीने पार पाडावी, या मागणीसाठी भाजप युवा मोर्चा व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी महेश तवले म्हणाले, एमपीएससी परिक्षेचा निकाल लागून बरेच महिने झाले तरी राज्य सरकारने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती दिलेली नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्याबरोबर त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होत आहे, या नैराशेतूनच नुकतीच स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही निंदनिय घटना असून, विद्यार्थ्यांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ रुजू करुन घ्यावे, अशी मागणी आम्ही करत आहोत. त्यामुळे असे अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी. आंदोलनाशिवाय सरकारला जाग येत नसल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही आंदोलन करणारच असे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा संयोजक अजिंक्य गुरावे म्हणाले, विद्यार्थी प्रतिकुल परिस्थिती शिक्षण घेऊन वर्षानुवर्षे अभ्यास करुन परिक्षा उत्तीर्ण होत आहेत, परंतु सरकार कोरोनाचे कारण पुढे करत या विद्यार्थ्यांना नियुक्त्या देत नाहीत. आज अनेक सरकारी कार्यालयातील पदे रिक्त असतांनाही उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्ती न देण्याचा चलढकलपणा हा विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतत आहे. राज्य सरकार असे आणखी किती बळी घेणार असाही सवाल यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले, सरचिटणीस आशिष अनेचा, यश शर्मा, सुबोध रसाळ, अ.भा.वि.प.चे जिल्हा संयोजक अजिंक्य गुरावे, कार्यालयीन मंत्री शुभम कुलकर्णी, शहर मंत्री अनुष्का सहस्त्रबुद्धे, चेतन पाटील, आदेश गायकवाड, आकाश सोनवणे आदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment