इंधन दरवाढीच्या विरोधात महिलांनंतर आता विद्यार्थी उतरले रस्त्यावर; विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 24, 2021

इंधन दरवाढीच्या विरोधात महिलांनंतर आता विद्यार्थी उतरले रस्त्यावर; विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने

 इंधन दरवाढीच्या विरोधात महिलांनंतर आता विद्यार्थी उतरले रस्त्यावर; विद्यार्थी काँग्रेसची निदर्शने


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांनी नुकत्याच इंधन दरवाढीच्या विरोधात देशाच्या पंतप्रधानांना थेट कुरियर द्वारे गोवर्‍या पाठविल्या होत्या. हा सबंध राज्यात चर्चेचा विषय झाला होता. आता काँग्रेसच्या महिलांनंतर नगर तालुक्यातील विद्यार्थी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून इंधन दरवाढीच्या विरोधात त्यांनी पेट्रोल पंपासमोर निदर्शने केली आहेत.
नगर तालुका विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुजीत जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर व तालुक्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत डिझेल, पेट्रोल, गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये निदर्शने केली आहेत. यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे रुतीक शिरवाळे, साहिल शेख, वैभव कांबळे, सुमित अडसुरे, यश अडसुरे, सिद्धार्थ कारंडे, सोमनाथ गुलदगड, योगेश जयस्वाल आदी उपस्थित होते.
महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमीर शेख, आ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा युवक, विद्यार्थी काँग्रेस जिल्हा समन्वयक किरण काळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष आकाश क्षीरसागर, युवक काँग्रेस अध्यक्ष ड.अक्षय कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या विभागाने इंधन दरवाढीच्या विरोधात आंदोलन छेडत विद्यार्थ्यांच्या मनात असणार्या असंतोषाच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
यावेळी बोलताना विद्यार्थी तालुकाध्यक्ष सुजित जगताप म्हणाले की, इंधन दरवाढीचा फटका विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. नगर शहरासह तालुक्याच्या विविध गावांमधून मुले महाविद्यालयीन, तसेच उच्च शिक्षणासाठी शहरात येत असतात. कोरोनामुळे महाविद्यालयांचे कामकाज जरी सुरळीतपणे सुरु नसले तरी देखील शैक्षणिक कामानिमित्त विद्यार्थ्यांना शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. दुचाकी वर प्रवास करणे आता उच्च शिक्षण घेणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पॉकिटमनीच्या बजेटच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पूर्वी एक लिटर मध्ये एक-दोन वेळा तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी लागणारा खर्च आता दुपटीवर गेला आहे.
त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये देखील इंधन दरवाढीबद्दल मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. महागाई वाढली आहे. गॅस दरवाढ झाली आहे. एका बाजूला पारंपरिक पद्धतीने वृक्षतोड करत चुलीवर स्वयंपाक करण्याच्या प्रकाराला बंदी घालण्यासाठी शासन वेगवेगळ्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असत. मात्र त्याच वेळेला स्वयंपाकाच्या गॅसचे दर हे आता हजार रुपयांना जाऊन भिडले आहेत. आमच्या माता, भगिनींनी घर चालवायच कसं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. हे आम्हा विद्यार्थ्यांना हताशपणे पहावे लागत आहे. या विदारक परिस्थितीला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार आहे, असा आरोप यावेळी जगताप यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment