राठोड यांना काव्यपुष्प समाजभूषण पुरस्कार जाहीर
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः चाळीसगाव येथील जिजाईसुत नावाने लेखन करणारे युवा कवी दिनेश जवरीलाल राठोड यांना काव्यपुष्प साहित्य मंच, मुंबई या संस्थेतर्फ काव्यपुष्प समाजभूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. प्रबोधनाची सामाजिक चळवळ हाती घेऊन सामूहिक वृक्षलागवड करणे, सामूहिक वाचनालय सुरू करणे, विविध विषयांवर व्याख्यान देणे, कोविड-19 काळात समाज जागृती करणे त्यासाठी योग्य ती मदत करणे. विविध साहित्य व पर्यावरणीय संस्थेच्या माध्यमातून कला आणि साहित्य व पर्यावरण क्षेत्रासाठी काम करणे. निमंत्रित कवी म्हणून अनेक संमेलनात सहभागी होणे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून जनजागृती करणे अशा त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या साहित्य कारकिर्दीत गांधी रिसर्च फाऊंडेशन जळगांव येथे भरलेल्या जिल्हास्तरीय बालसाहित्य संमेलनात त्याच्या आईबाबा या कवितेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. न्यायिक लढा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनात तालिबानी दहशतवादी संघटना ह्या त्याच्या कवितेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित प्रतिभा संगम राज्यस्तरीय साहित्य संमेलनात त्यांच्या कथेला आणि ब्लॉगला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. पारस कला, साहित्य, सांस्कृतिक मंच सानपाडा मुंबई यांच्या तर्फे त्याला समाजभूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलेले आहे. जामनेर तालुका साहित्य, संस्कृती मंडळ यांच्या तर्फे आयुष्याचं चित्र या त्याच्या कवितेने पुरस्कार पटकावला आहे. आझाद हिंद संघटना बुलडाणा या संस्थेतर्फे साहित्यभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. अशा विविध संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे आणि पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहेत. एकंदरीत उल्लेखनीय साहित्यिक कारकीर्द व त्याच्या समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रभर ओळख असलेल्या काव्यपुष्प साहित्य मंच द्वारे दिनेश राठोड यास काव्यपुष्प साहित्य मंच समूहाचा प्रथमच काव्यपुष्प समाज भूषण हा विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला. दिनेशला दिल्या जाणार्या या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, रोख, पुस्तक स्वरूपातील भेट व गौरव प्रमाणपत्र असे असून लवकरच काव्यपुष्प साहित्य मंच समूहाच्या येत्या प्रथम साहित्य संमेलनात दिनेशला हा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लेखणीच्या जोरावर, शब्दांच्या पावसात वेदना व वास्तव सामाजिक आशय मांडणार्या दिनेश राठोड यांचे या विशेष पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment