विधानसभेच्या मदतीची राष्ट्रवादीने परतफेड करावी! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

विधानसभेच्या मदतीची राष्ट्रवादीने परतफेड करावी!

 विधानसभेच्या मदतीची राष्ट्रवादीने परतफेड करावी!

महापौरपदावर काँग्रेसचा दावा; शीला चव्हाणांचा केला ठराव...

भाजपा कार्यालयातील महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या उपस्थितीत काल संपन्न झालेल्या बैठकीत आ.संग्राम जगताप यांनी उपस्थिती लावल्यामुळे शिवसेना व काँग्रेसच्या महापौरपदावरील दाव्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आता राजकीय हालचालींना वेग आला असून आ.संग्राम जगताप काँग्रेस व शिवसेनेला धक्का देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
विधानसभा निवडणुकी वेळी राज्यात असणार्‍या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीमुळेच नगर शहरामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आमदारकीचे यश आले. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या विजयामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. ही बाब विसरून चालणार नाही. मनपा निवडणुकी वेळी देखील आघाडीच होती. याचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फायदा झाला आहे. आता राष्ट्रवादीने काँग्रेसला या वेळी साथ देत त्याची परतफेड करावी, असे आवाहन शहर कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी राष्ट्रवादीला केले आहे.
मनपा अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसला केवळ एकदाच महापौर पदाची संधी मिळाली. ही संधी राष्ट्रवादी, शिवसेनेला अनेक वेळा मिळाली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. शीला दीप चव्हाण यांच्या रूपाने काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहे. जातीयवादी पक्षाला बाजुला करत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसला महापौरपदाची संधी मिळावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याची सांगत आता काँग्रेसने महापौर पदावर आमचा दावा असल्याचेही ते म्हणाले. महापौर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्यातच शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने अनुसूचित जाती विभागातून पक्षाच्या नगरसेविका असणार्‍या शीला दीप चव्हाण यांना महापौर करण्याबाबतचा ठराव पक्षीय व्यासपीठावर संमत केला असल्याची माहिती काळे दिली .
काळे पुढे म्हणाले की, सर्वात जास्त नगरसेवकांची संख्या ही खरेतर शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेना महापौर पदाचे प्रबळ दावेदार असणे आम्ही समजू शकतो. पक्ष म्हणून तो त्यांचा अधिकार आहे. पण काँग्रेसला देखील संधी मिळाली पाहिजे. जातीयवादी पक्षाला बाजूला ठेवत राज्या प्रमाणे शहरात देखील महाविकास आघाडी  एकत्र आल्यास मनपावर महाविकास आघाडीचा झेंडा फडकू शकेल असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे. महापौरपदासाठी आता काँग्रेसनेही स्थानिक पातळीवर कंबर कसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपशी सोडचिठ्ठी घेत राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगर मनपामध्ये एकत्र येणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. किरण काळे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे मनपात पाच नगरसेवक आहेत. संख्यात्मक दृष्ट्या जरी काँग्रेसची ताकद कमी असली तरी देखील मनपा स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादीला तसेच शिवसेनेला प्रत्येकी तीन वेळा महापौर पद मिळाले आहे. एक अपवाद वगळता काँग्रेसला मागील अनेक वर्षांपासून शहरात संधी मिळाली नाही. सद्य परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाकडे महापौरपदाच्या आरक्षणासाठी असणारा सक्षम उमेदवार आहे.

No comments:

Post a Comment