अहोरात्र अंत्यविधी करणाऱ्यांसाठी ५ लाखांच्या विम्याची आर्थिक तरतुद- जागरुक नागरिक मंचचा पुढाकार
नगरी दवंडी
अहमदनगर – नगर येथील अमरधाम स्मशान भूमीत सध्या रोज ५० ते ६० कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. स्वप्निल कुर्हे व त्यांचे सहकारी ज्या पध्दतीने तळहातावर प्राण घेऊन अहोरात्र दररोज या ५०-६० जणांचे अंत्यसंस्कार विधी करत आहेत, त्याची कशाचीच तुलना होऊ शकत नाही असे मत जागरुक नागरीक मंचचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांनी व्यक्त केले.
जागरुक नागरीक मंचच्या वतीने श्री.कुर्हे व त्यांच्या सर्व सहका-यांचा छोटेखानी समारंभात सुरक्षित अंतर पाळून सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.मुळे बोलत होते. या छोटेखानी कार्यक्रमात सर्वांना लस्सीचे पाकीटे व पुष्पगुच्छ देऊन अतिशय अल्प अशी कृतज्ञता जागरुक नागरीक मंचच्यावतीने व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा होते. मुळे पुढे म्हणाले, आज रक्ताचा माणूस दुर उभा राहतो पण स्वतःचे घरदार कुटुंब विसरून ही मंडळी जे काम करत आहेत त्याना आम्ही कृतज्ञतेने मुजरा करून आलो, साश्रू नयनांनी पाठीवर आपुलकी ची थाप देऊन आलो. सीमेवरती देशासाठी लढणारे सैनिक आणि यांच्यामध्ये खरे म्हणजे काहीही फरक नाही. सामान्य माणूस एक मृतदेह आणि त्याचे अंत्यसंस्कार मन घट्ट करूनही बघू शकत नाही, अशा वेळी पहाटे तीन वाजेपर्यंत दररोज ५० ते ६० मृतदेहांवर अव्याहतपणे निश्चल राहून अंत्यसंस्कार करणे, यासारखे दुसरी तपश्चर्या नाही.
या खऱ्या खुऱ्या कोविड योध्दा असणाऱ्यासांठी ५ लाखांच्या विम्याची आर्थिक तरतुदी सह व्यवस्था सर्वांच्या मदतीने केली आहे. या सर्वांच्या कार्याची माहिती त्यांच्या छायाचित्रासह सर्वत्र प्रकाशित करणार आहोत. या कार्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असेही ते म्हणाले. या वेळी दिनदयाळ परिवाराचे सदस्य वसंत लोढा, कैलास दळवी, मकरंद घोडके, राजेन्द्र पडोळे, योगेश गणगले, राजेश सटाणकर, देवीप्रसाद अय्यंगार, प्रसाद कुकडे, अमेय मुळे, विशाल गायकवाड.इ. संवेदनशील नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment