संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व कधीही संपत नाही - शिवाजीराव कर्डिले
बाजार समितीच्या वतीने कर्डिले व घुले यांचा सत्कार
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्रात जिल्हा बँकेला अग्रणी बँक म्हणून पाहिले जाते. अशा या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून स्वतः पुढाकार घेतला. परंतु आपले सर्व उमेदवार कारखानदारांनी बिनविरोध करीत निवडणूक लादली. शेवटच्या क्षणी आपल्या विरोधात उमेदवार उभे करीत कुरघोडी केली. एका अर्थाने ते बरेच झाले. कारखानदारांना आता समजले की, संघर्षातून व शेतकरी वर्गातून उभे राहिलेले नेतृत्व कधीही संपत नाही. शेतकर्यांनी मला पाठबळ देत जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवडून दिले. पहिल्या टप्प्यातच 140 कोटींचे कर्ज शेतकर्यांना दिले. भविष्यात आता ही बँक शेतकर्यांसाठी, गोरगरीबांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना अधिक सक्षमपणे राबवू, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
अ. नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व मनपा स्थायी समिती सभापतिपदी अविनाश घुले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अ.नगर कृषी उत्पन्न बाजार समिती व हमाल पंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. कर्डिले बोलत होते. याप्रसंगी समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, संचालक बहिरू कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, रामदास आंधळे, निखील वारे, नंदू बोरुडे, शिवाजी कार्ले, बाबासाहेब जाधव, राम पानसंबळ, मच्छिंद्र दहिफळे, विश्वास शिंदे, शिवाजी मोढवे, संदीप होळकर, रतन आजबे, अशोक जायभाय, ढाकणे, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, सानप, महिला, हमाल, मापाडी, शेतकरी व व्यापारी आदी उपस्थित होते.
श्री. अविनाश घुले म्हणाले की, बाजार समिती व हमाल पंचायत यांनी केलेला आजचा हा सत्कार माझ्या घरचा सत्कार आहे. व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी आदींनी केलेला हा सत्कार मला माझ्यावरील जबाबदारीची जाणीव करून देतो. बाजार समितीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवू. हमाल पंचायतच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न आपणास ज्ञात असून, ते सोडविण्याचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यांचे हक्क त्यांना मिळवून दिले आहेत, असे ते म्हणाले.
अभिलाष घिगे म्हणाले की, मतदारांनी पुन्हा एकदा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना संचालक करून विरोधकांना चपराक दिली आहे. गोरगरीब, कष्टकरी व शेतकरी यांचे प्रश्न आता बँकेच्या माध्यमातून सुटतील. जिल्हा बँकेवर कर्डिले यांची निवड झाल्याने कारखानदारांची मक्तेदारी मोडीत निघेल. शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज आदर्श पद्धतीने करीत असून, श्री. कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करीत आहोत, असे ते म्हणाले. यावेळी उपसभापती संतोष म्हस्के, नगरसेवक राहुल कांबळे, रामदास आंधळे, निखील वारे यांचे समायोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप महापुरे यांनी केले, तर आभार बहिरू कोतकर यांनी मानले.
No comments:
Post a Comment