औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय...
बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम तूर्तास ‘जैसे थे’ ठेवा..!औरंगाबाद : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम तूर्तास ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. औरंगाबादेतील महात्मा गांधी कॅम्पसमधील प्रियदर्शनी उद्यानामधील अनेक झाडं तोडून स्मारक उभं करण्याची योजना आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सुनील देशमुख आणि न्यायमूर्ती आहुजा यांनी हे आदेश दिले आहेत. प्रियदर्शनी उद्यानातील झाडं तोडून स्मारक उभं करण्याच्या योजनेला अनेक पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शवला होता. प्रियदर्शनी बचाव मोहीम सुरु करण्यात आली होती. याची दखल घेत न्यायालयाने कामाची पाहणी केली आणि अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. अहवालानंतर औरंगाबाद खंडपीठ पुढील निर्णय देणार आहे.
प्रियदर्शनी उद्यानातील 1215 झाडे गेली कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वृक्षतोड रोखण्यासाठी याआधी जनहित याचिका दाखल केलेली होती. बांधकाम करत असताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते परंतु याचे पुनर्रोपण केले जात नसल्याचे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले होते.
2025 साली बाळासाहेबांच्या प्रखर राष्ट्रवादी ज्वलंत हिंदुत्वाची प्रेरणा देणारं स्मारक उभारणार आहोत,हिंदुत्ववादी म्हणजे राष्ट्रीयत्व सांगणारे हे स्मारक असेल,अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डिसेंबर 2020 मध्ये केली होती. ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल म्हणून होती, त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन रिमोट कंट्रोलनेच होणं हा योगायोग आहे. या स्मारकात नुसता पुतळा नसेल तर या स्मारकातून अनेकांना हिंदुत्वाची प्रेरणा मिळेल, असं भव्यदिव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. दरम्यान, आरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडला वृक्षतोडीवरुन स्थगिती देणार्या शिवसेनेवर दुटप्पीपणाचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबादमधील 17 एकरचे प्रियदर्शिनी उद्यान आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महापालिकेत या परिसरातील झाडांची कत्तल झाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
No comments:
Post a Comment