कृषी अधिकारी व कर्मचार्यांबद्दल बेताल वक्तव्य करणार्या प्रवीण ठाकरेंचा महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्यावतीने निषेध
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्याने देशात अतिशय उत्कृष्ट काम केल्याने महाराष्ट्राचे कृषिमंत्री, सचिव, कृषी आयुक्त यांना राज्याचे प्रमुख म्हणून गौरविण्यात आले, तर भौतिक तपासणी संवर्गात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच राज्यातील नगर जिल्ह्यास प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमावर महाराष्ट्र राज्य नायब तहसीलदार संघटना, मुंबईचे विभागीय अध्यक्ष प्रवीण ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. वरील कार्यक्रमाबाबत त्यांनी बेताल वक्तव्य केले आहे. याचा येथील महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने निषेध करून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बाचकर, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय रोहोकले, नारायण घुले, सुरेश घोलप, नीलेश बिबवे, पांडुरंग जाधव, अप्पासाहेब गट आदी उपस्थित होते.
राठोड यांनी कृषी विभागाचे योगदान नाकारून कृषी अधिकार्यांचा कोणत्याही योजनेत इंटरेस्ट नसतो. ते फक्त बैठकीला उपस्थित राहतात. कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. याबाबतचा त्यांचा कुठलाही अभ्यास नसताना त्यांंनी हे बेताल वक्तव्य करून आपल्या ज्ञानाचा कमकुवतपणा दाखवून दिल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
कृषी सेवकाला या योजनेची माहिती, निकष, वेबसाईट सांगता येत नसल्याचा निंदणीय आरोप करून राठोड यांनी राज्यातील तमाम कृषी सहाय्यकांच्या भावना भडकावल्या असून, त्या अत्यंत तीव्र्र आहेत. याचा कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभर निषेध करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ग्रामस्तरावर कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे कामकाज सोपवले होते. ते कामकाज पूर्ण झाले आहे. तिन्ही विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचार्यांनी सम प्रमाणात काम केल्याचे सिद्ध होते. वस्तुस्थिती अशी असतानाही कृषी सेवकाला या योजनेची माहिती, निकष, वेबसाईट सांगता येत नाही याचा शोध या उर्मट पदाधिकार्यास कोठे लागला, याचा शोध कृषी सहाय्यक संघटना न्यायिक कायदेशीर लढाई लढून लावतील, असेही निवेदनात म्हटले आहे. मात्र, हे पदाधिकारी कृषी सहाय्यकांबाबत अतिशय निंदणीय वक्तव्य करून राज्यातील कृषी सहाय्यकांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम करीत असून, याची शासनाने दखल घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील कृषी विभागाच्या कर्मचार्यास त्रास देण्याचा प्रकार झाल्यास निश्चित कृषी सहाय्यक संघटना तीव्र आंदोलन करील. संबंधित पदाधिकार्यास वरील विषयाच्या अनुषंगाने समज देऊन त्यांच्या मुखातून गेलेले अपशब्द मागे घेण्यास प्रवृत्त करावे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment