सुपा-वाळवणे रस्त्यालगत कोंबड्यांचे मांस टाकल्याने दुर्गंधी
रस्त्यावरून ये-जा करताना सोसाव्या लागतात नरकयातनानगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाची व संवेदनशील समजल्या जाणार्या सुपा शहरात गेल्या एक वर्षापासून कचरा व्यवस्थापनाचे घोडे अडल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून ग्रामस्थांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सुपा मेन चौकापासून काही अंतरावर वाळवणे रस्त्यालगत स्मशान भुमी जवळच किचन सेंटर चालकांकडून कोंबड्यांचे वेस्टेज कुजलेले मांस फेकून दिले जात असल्याने येणार्यां जाणार्यांना व एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांसह पाहुण्यांना या घाणीचा सामना करावा लागत आहे.तर संपूर्ण शहरातील शौचालयासह गटारीचे पाणी या स्मशानभूमी लगत असलेल्या ओढ्यात सोडण्यात आल्याने सर्वांनाच नरकयातना सहन कराव्या लागत आहे.याकडे पुढार्यांनी लक्ष देऊन कोंबड्यांचे मांस टाकणार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांमधून केली जात आहे.
पारनेर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात सुमारे तेरा ते चौदा गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सुपा जुनी औद्योगिक वसाहत व नव्याने विकसित होत असलेल्या म्हसणे फाटा औद्योगिक वसाहतीमुळे सुपा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याप्रमाणात ग्रामपंचायतीच्या सुविधा तोडक्या पडत आहे. गेल्या एक वर्षापासून कचरा व्यवस्थापनाचा बोजबारा उडाला असून गल्ली बोळात, पेठेत, बाजारतळ परीसर, जुने पोलीस स्टेशन परिसरात व सुपा- वाळवणे रस्त्यावर घाणीचे मोठ मोठे ठिग लागल्याचे चित्र दिसत आहे.यामध्ये कोंबड्यांचे कुझलेले मांस फेकले जात असल्याने ग्रामस्थांना, प्रवाशांना व शाळेतील मुलांना तोंड दाबून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
गेल्या एक वर्षापासून ग्रामस्थांनी या घाणीचा मोठ्या धैर्याने सामना केला.ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी तक्रार करून देखील त्याची दखल घेतली गेली नाही.त्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आज ना उद्या सरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडेल. मात्र या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना कचरा व्यवस्थापनावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. अन्यथा ग्रामस्थांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल हे मात्र नक्की.
No comments:
Post a Comment