दिल्लीतील हायकमांडकडून शिक्कामोर्तब...
काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदी नाना पटोले?नवी दिल्ली ः महाराष्ट्रात एकीकडे ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी सुरु असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदारुन जोरदार चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती मिळत आहे आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेसमध्ये ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया सुरु होती. त्यात नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे. नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष हा विदर्भातून असेल. पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत उडी घेतली होती. ‘काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद विदर्भातील मंत्र्याला मिळावं’ अशी मागणी धानोरकरांनी केली आहे. बाळू धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत विदर्भासाठी दावेदारी केली होती.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तृळात रंगली आहे.
No comments:
Post a Comment