हाथरसचा खटला ‘यूपी’बाहेर चालवावा ः कदम
हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने कॅन्डल मार्च
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील तरुणीवर झालेल्या सामुहिक अत्याचाराचा निषेध करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने चौपाटी कारंजा ते दिल्लीगेट कँडल मार्च काढण्यात आला होता.
यामध्ये माजी महापौर सुरेखा कदम, महिला जिल्हा प्रमुख आशा निंबाळकर, शहर प्रमुख अरुणा गोयल, सुजाता कदम, हेमा खैरे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, जेष्ठ नेते अंबादास पंधाडे, संजय शेडगे, गणेश कवडे, दत्ता कावरे, सूरज शेळके, रमेश परतानी, संतोष शिंदे आदी सहभागी झाले होते.
हा कॅन्डल मार्च दिल्लीगेट येथे आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकाराचा निषेध करण्यात येऊन मुख्यमंत्री योगी व तेथील पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, उत्तर प्रदेशमध्ये लोकशाही नसून जंगलराज सुरु आहे. तेथील महिला सुरक्षित नसून त्यांच्यावरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे योगी सरकारवरील तेथील जनतेचा विश्वास उडाला आहे.
यावेळी आशा निंबाळकर, अरुणा गोयल, अंबादास पंधाडे आदिंनी आपल्या भावना व्यक्त करुन हतरस येथील घटनेचा निषेध करुन योगी सरकारवर टिका केली व पिडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. शांततेत निघालेल्या या कॅन्डल मार्चमध्ये महिला मोठ्यासंख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी पिडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली.
No comments:
Post a Comment