शिवसेनेने कार्यकारी अभियत्यांना धरले धारेवर !
तपोवन रस्त्याचे काम निकृष्ट काम झाल्याने शिवसेनेचा पवित्रा
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः तपोवन रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीतून सुरु आहे. मात्र या रस्त्याचे निकृष्ट काम झाल्याने शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांनी आक्षेप घेऊन कामची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या पुण्याच्या कार्यालयामार्फत जुलै महिन्यात कामाची पाहणी, दर्जा तपासणीसाठी वरिष्ठ गुणवत्ता निरिक्षकांची नियुक्ती केली होती. याचा चौकशी अहवाल न मिळाल्याने शिवसेना पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता एच. एन. सानप यांना धारेवर धरले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
चौकशी व गुणवत्ता तपासणी अहवाल अद्याप का प्राप्त झाला नाही? मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्यामुळे तपोवन रस्त्याचे काम निकृष्ट झाले. हा रस्ता पुन्हा नव्याने करावा. रस्त्याच्या कामाची निविदा रद्द करून पुन्हा नव्याने निविदा काढण्यात यावी. ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, शहरप्रमुख दिलीप सातपुते, उपजिल्हा प्रमुख आनंद लहामगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, परेश लोखंडे, ऋषिकेश ढवन, दत्ता हजारे आदी उपस्थित होते.
भगवान फुलसौंदर म्हणाले की, मनमाड व औरंगाबाद रस्ता जोडणारा तपोवन रस्ता उपनगरातील प्रमख रस्ता आहे. उपनेते अनिल राठोड यांनी या रस्त्याच्या दर्जेदार कामासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, मुख्यमंत्री निधीतील या पैशाचा मोठ्या प्रमाणात अपहार झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे खड्डे पडले आहेत. याचा जाब आम्ही कार्यकारी अभियंत्यांना विचारला आहे.
दिलीप सातपुते म्हणाले की, शिवसेना नगर शहरातील विकासकामांवर लक्ष ठेऊन आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय होवू नये, यासाठी आम्ही कायम आक्रमक असतो.
अभिषेक कळमकर म्हणाले की, या कामात कोट्यवधीचा गैरव्यवहार झाला आहे. ठेकेदाराणे बोगस काम केले आहे. यामुळे शिवसेना या ठेदारावर गुन्हा दखल करणार आहे. तसेच लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहे. बाळासाहेब बोराटे यांनी शिवसेना शांत न बसता रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.
यावेळी कार्यकारी अभियंता सानप यांनी अद्याप अहवाल कार्यालयास प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. गुणवत्ता निरिक्षक संतोष चौधरी यांच्या संपर्क करून अहवाला बद्दल त्यांनी चौकशी केली.
No comments:
Post a Comment